पोलादपूर, माणगाव,पेण तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची केली पाहणी
रायगड, दि, १८ ऑक्टोबर- राज्य सरकारने आता शेतीचे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांची नाटके बंद करा व घोषणाही बंद करा. कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्यांच्या हातात तातडीने पैसे जाऊ द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्हयातील पोलादपूर, माणगाव,पेण तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केली.सोबत आमदार रविशेठ पाटील, रायगडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड.महेश मोहिते उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील उसरघर आणि रातवड या गावी पेण मधील वडखळ विभागातील बोरवे, मसद शिर्की, बोरी या भागातील नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी केली.
शेतकरी हताश झालेला आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. मागील पंचनाम्यांचे पैसे अजून दिले मिळाले नाही. पीक कर्जही मिळत नाही , कर्जमाफी पण होत नाही. फक्त घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जातात पण प्रत्यक्षात कृती मात्र शून्य अशी या सरकारची अवस्था असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
नुकसानग्रस्त झालेल्या शेतक-यांना किमार निदान २५ हजार हेक्टरी रुपये द्यावेत कारण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा स्वतंत्र जीआर काढून शेतक-याला १८ हजार हेक्टरी पैसे दिले. पंचनामे न करता शेतकऱ्यांना पैसे दिले. राज्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत न बसवित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की,. सरकारमधील त्यांचे जलसंधारण मंत्री मात्र उस्मानाबाद मध्ये जाऊन सांगत आहेत की, सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे उपुख्यमंत्री म्हणतात आम्ही कर्ज काढून राज्य चालवत आहोत अशी टीकाही त्यांनी केली.
कोकणातला शेतकरी धीट आहे, तो लगेच हिम्मत हारत नाही. पण घरात कोणी कमविता नाही. शेती उध्वस्त झाली आहे, त्यामुळे सरकारने पत्रव्यवहारचे सोपस्कार न करता शेतकऱ्यांना थेट मदत करावी. ज्यांची शेते खराब झाली आहे त्यांच्या शेताचे फोटो काढून वास्तुस्थितीदर्शक पध्दतीप्रमाणे मदत करावी अशी मागणीही दरेकर यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांना वा-यावर सोडले आहे. मी अतिवृष्टीची पाहणी करत असताना निर्देशनास आले की निसर्ग वादळामुळे शेतीचे जे नुकसान झाले त्याचेच अद्याप पंचनामे करण्यात आले नाही असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे नाहीत, पैसे दिले नाहीत, फक्त कोट्यवधीच्या घोषणा केल्यात पण प्रत्यक्षात मदत नाही. मराठवाड्यात चार चार महिने झालेत पंचनामे नाही असा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकार म्हणून तुमच्या जबाबदारी आधी पूर्ण करा. आज हतबल हताश झालेल्या शेतकऱ्याला पैसे द्या अशी मागणीही दरेकर यांनी केली.