मुंबई- जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेनं मराठी भाषा दिन साजरा करू नका.”
विधानभवनातील ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमानिमित्त बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, “जेव्हा आपल्यावर संकंटे आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमाणावेळीही मराठी धावून गेली होती. मराठी भाषा ही साधीसुधी भाषा नाही आहे. एक जमाना असा होता की मराठ्यांच्या घोड्यांचा टापांचा जरी आवाज आला तरी दुश्मनांची पळापळ व्हायची, त्या मराठीचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे..? मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही. आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते, हे दुर्दैव आहे”, असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलतानात ते म्हणले की, “मराठी मराठी आहे, ती राहणारच! मराठी दगडावर कोरली गेली आहे, हृदयावर कोरली गेली आहे, डोंगर-कपाऱ्यावर कोरली गेली आहे. ती माझी मराठी, आपण नुसते बोलत राहिलो तरी दुसरे कशाचीही आवश्यकता लागणार नाही. मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की मराठी भाषा ही ऱ्हस्व दीर्घाप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे”, असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
“पूर्वी वासुदेव यायचे, आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची वाणी ऐकायला यायची. परंतु नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहित नाहीत. ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसे मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे. अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपल्याला तो टिकावता आला पाहिजे. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी राहिलं पाहिजे. हा जो एक दिवस आहे, तो आजच्या दिवसापुरता न राहता, वर्षापुरता न राहता, संपूर्ण आपलं आयुष्य मराठी, मराठी आणि मराठी असच असू द्या एवढीच एक विनंती करतो,” असेही ते म्हणाले.