एमआयटी डब्ल्यूपीयूत जागतिक महिला दिन साजरा
पुणे, दि. ८ मार्च: “स्व सुरक्षेबाबत आत्मनिर्भर होणे, मुलींना स्व रक्षणाचे प्रशिक्षण देणे आणि प्रत्येक मुलांच्या मनात स्त्री बद्दल आदर सन्मानाचे बीज पेरण्याचे कार्य घरा घरातून व्हावे. त्यातून समाजात एका प्रकारची स्थिरता निर्माण होईल.”असा सल्ला शास्त्रीय गायिका सुवर्णा माटेगावकर यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी गौरी पटवर्धन, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता गवळी, अहिल्या फाउंडेशनच्या संस्थापिका रमा लटपटे, कथ्थक नृत्यांगणा शमा भाटे आणि तेजस्वीनी या सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होत्या. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, प्रा.डॉ.पोर्णिमा इनामदार, प्रा.डॉ.अंजली साने, प्रा.डॉ. मृदुला कुलकर्णी, प्रा.डॉ. प्रिती जोशी आणि विद्यार्थी प्रतिनिधी तन्वी राऊत उपस्थित होत्या.
या प्रसंगी एमआयटीमध्ये सेवा देणार्या महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शमा भाटे यांनी कथ्थक नृत्यांच्या माध्यमातून नारी शक्तीचे विविध रूपे सादर केलीत.
सुवर्णा माटेगावकर म्हणाल्या,“ कोणत्याही मुलीला बंधनात न ठेवता तिला सबलाी बनविण्याची जवाबदारी पालकांची आहे. शारीरिक व मानसिक रूपाने मजबूत करण्याच्या दिशेने पाऊले उचलावी. वर्तमान काळात महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तव्य सिध्द केले आहे. त्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक सारख्या विविध जवाबदार्या यशस्वीपणे पार पाडतांना दिसत आहेत. हे सर्व करतांना स्वतःकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी आपला छंद जोपासावा.”
शमा भाटे म्हणाल्या,“भारतीय समाजात स्त्रियांचे महत्व अतुलनीय आहे. समाजाने महिलांंना समता आणि समानता दयावी. तसेच समाजातील प्रत्येकाने स्त्रियांचा आदर करावा.”
सुनिता गवळी म्हणाल्या,“ महिलांनी स्वतःचे आरोग्य जोपासणे हे सर्वात मोठे सबलीकरण आहे. तसेच पुरूषांनी घरातील प्रत्येक महिलांचे आरोग्य जपणे हे त्यांचे कर्तव्य आहे.”
गौरी पटवर्धन म्हणाल्या,“महिलांना स्वतःचे बंधन तोडून आपले नवे विश्व निर्माण करावे. तसेच त्यांनी एक व्यक्ती म्हणून समाजात वेगळी ओळख बनवावी. त्या अबला नसून सृष्टीवरील चैतन्य स्वरूप शक्ती आहे.”
तेजस्विनी म्हणाल्या,“ देशातील महिलांनां आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. त्या दिशेने त्यांनी स्वतःला मजबूत करून बदलत्या काळानुसार आपल्यात परिवर्तन करावे. त्यांनी योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यासाठी ते उपयोगी पडेल.”
कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन विद्यार्थी उन्नती दीक्षित व गौरी मरखेडेवार यांनी केले. गणेश पोकळे यांनी आभार मानले.