नवी दिल्ली–
दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतर मैदानावर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर कठोर कारवाई केली. पोलिसांनी जंतरमंतरहून नव्या संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. त्यांचे तंबूही काढून टाकले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर तिखट टीका केली आहे. ते म्हणाले – ‘राज्याभिषेक संपला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे!’
प्रियंका गांधींचाही ट्विटद्वारे निशाणा
कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले. त्या म्हणाल्या – ‘खेळाडूंच्या छातीवरील पदके आपल्या देशाची शान आहेत. त्या पदकांमुळे खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार एवढा वाढला आहे की, सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज पायदळी तुडवत आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. सरकारचा अहंकार व हा अन्याय उभा देश पाहत आहे.’
गत 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सकाळी 11.30 वाजता कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. ते हे बॅरिकेड्स ओलांडून पुढे जात असताना त्यांची दिल्ली पोलिसांशी चकमक झाली. यावेळी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. यावेळी अनेक पैलवान अक्षरशः रस्त्यावर पडले होते.
मल्लिकार्जुन खरगेंचाही कुस्तीपटूंना पाठिंबा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईविरोधात ट्विट केले. ते कुस्तीपटूंना पाठिंबा देत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले –
‘नव्या संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून हिसकावून घेतला गेला. महिला खेळाडूंना हुकूमशाहीच्या जोरावर रस्त्यावर मारहाण! भाजप-आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे 3 खोटे दावे आता देशासमोर उघड झाले. 1. लोकशाही, 2. राष्ट्रवाद, 3. बालिका वाचवा….मोदीजी लक्षात ठेवा,’