मुंबई -सोमवारपर्यंत वीज बिल माफ केले नाही तर राज्यात जनआंदोलन करु, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वाढीव वीजबिलासंबंधित मनसे पदधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात मनसेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, वाढीव वीजबिलात माफ करण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नांदगावकरांनी केले आहे. तसेच सोमवारपर्यंत वीजबिल माफ केले नाही तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलनं होतील. तसंच, महावितरणचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आल्यास मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील असा विश्वास त्यांनी दिला आहे.
पवार साहेबांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरलेली नाही – बाळा नांदगावकर
यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वाढीव वीजबिल माफ करण्यात यावे यासाठी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर पवारांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करु असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झालेला नाही नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही असे वाटतेय असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.