नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे मंगळवारी (ता. २६) राज्यसभेतील १९ खासदारांना आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी (ता. २५) काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. खासदारांना सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्यामुळे आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.महागाईचा निषेध करण्यासाठी लोकसभेत फलक दाखविल्याबद्दल सोमवारी काँग्रेसच्या चार खासदारांना संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. या खासदारांनी दुपारी हातात फलक घेऊन लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्योतिमणी, मणिकम टागोर, टीएन प्रथापन आणि रम्या हरिदास यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत महागाई, जीएसटीवरून विरोधकांनी गदारोळ केला. प्रमुख मुद्द्यांवर चर्चेपासून सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली, परंतु विरोधी सदस्यांनी जीएसटीविरोधात घोषणाबाजी आणि फलकबाजी सुरूच ठेवली. यानंतर संतप्त झालेल्या सभापतींनी खासदारांना निलंबित केले.तुम्ही येथे घोषणाबाजी करण्यासाठी आला आहात की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आला आहात, असा सवाल सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांना केला. सभागृह चालले पाहिजे, अशी देशातील जनतेची इच्छा आहे. जर तुम्हाला फलक दाखवायचे असतील तर सभागृहाबाहेर दाखवा. त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब केले होते.