पुणे-जगातील सर्वात मोठे लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांचे म्हणणे आहे की, कोरोना लस बाजारात आली तरी ती प्रत्येक भारतीयाला उपलब्ध होण्यास दोन वर्षे लागतील. मात्र आम्हाला निश्चिंत राहायचे नाही. बचावासाठी आपल्याला मास्क लावणे, दोन मीटरचे अंतर या सारख्या सवयींसोबत जगायचे आहे.
मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्क्वायरी’साठी ज्येष्ठ पत्रकार शाेमा चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीचा संपादित भाग…
देशात आता लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही…
पहिले लॉकडाऊन आवश्यक होते. मात्र आता तेवढे परिणामकारक ठरणार नाही. यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल. लहान दुकानदार, रोजंदारीवर पोट भरणाऱ्यांसाठी आता उपजीविकेचे संकट उभे राहील.
बिल गेट्स आदर्श, मदत विसरू शकत नाही…
बिल गेट्स माझे आदर्श आहेत. त्यांच्याकडून नेहमी शिकतो. धनादेश देणेच समाजकार्य नाही. संकटात जगाला किती वेळ देता हे महत्त्वाचे आहे. लस बनवण्यासाठी त्यांची मदत जग विसरू शकत नाही.
देशात खालच्या पातळीवरील व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणार
लसीसाठी आम्ही १५०० कोटी रु. खर्च केले आहेत. सर्वात मोठे लस उत्पादक असल्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती सहज उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे. मानवता आमची पहिली प्राथमिकता आहे. मी माझ्या मुलांना हेच शिकवले की नेहमी गरिबांची मदत करा. माझ्या आईनेही मला हेच शिकवले आहे.
चाचणीत ९०% इम्युन रिस्पॉन्स, साइड इफेक्टही नाही
पुनावाला यांनी सांगितले की, आतापर्यंत लसीवर जे संशोधन करण्यात आले त्यात ९०% पर्यंत इम्युन रिस्पॉन्स असल्याचे दिसून आले. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालानंतर स्थिती आणखी स्पष्ट होईल. त्याचेही साइड इफेक्टही नाहीत. येत्या दोन- तीन महिन्यांत मानवी चाचणी यशस्वी झाल्यास आपण उत्सव साजरा करू.
आरोग्य नाही तर दुसरे कोणतेच क्षेत्र नसेल
महामारीने शिकवले की, जर आरोग्य नसेल तर दुसरे कोणतेही क्षेत्र नसेल. कोणतीही लस बाजारात येण्यासाठी ३ ते ४ वर्षांचा काळ लागतो. नियामक यंत्रणा आता वेगाने काम करत आहे. ज्या कामांना वर्ष लागायचे ती आता ३ ते ४ दिवसांत होताहेत. मंजुरी लगेच मिळत आहे.