मुंबई दि. ६ : दैनिक ‘पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर शिंगोटे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, जुन्नर तालुक्यातील उंब्रज सारख्या छोट्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. पुण्य नगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, कर्नाटक मल्ल्या, तमिळ टाईम्स, यशोभूमी, हिंदमाता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड या चार भाषिक वाचकांना जोडले. मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमीका ठेवली. त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल.
शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीची हानी – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
दैनिक ‘पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची हानी झाली आहे, अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. शिंगणे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाबा शिंगोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च 1938 ला झाला होता. शिक्षण सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला वृत्तपत्र टाकण्याचे काम त्यांनी केले. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. सन 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. त्यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.
त्यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीतील एक अध्याय समाप्त झाला आहे असेही डॉ. शिंगणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.