पुणे : जयंत पाटील केवळ जलसंपदा मंत्रीच नाही तर प्रथम ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे आज त्यांनी दाखवून दिले आणि पुण्याचा महापौर पाणी कपातीच्या जलसंपदा च्या आदेशावरच बोलण्यासाठी तासभर प्रतीक्षा करत असताना, त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून पत्रकार परिषद घेऊन पुण्याची पाणी कपात करण्याचा निर्णय संपूर्णतः मागे घेतली पुणेकरांच्या रोषाला आता सामोरे जावे लागेल हे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणविसांवर राजकीय टिप्पणी केली असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी येथे केला . एकंदरीत या प्रकरणी चुकीचे आदेश काढून , पोलीस बंदोबस्तात पाणी कपात करा असे शब्द टाकून , नंतर पुण्याच्या महापौरांना टाळून जयंत पाटील यांनीच हे राजकारण केल्याची अप्रत्यक्ष टीका महापौरांनी केली आहे.
ते म्हणाले,’ पुण्याच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची वेळ घेऊन पाच वाजता सिंचन भवन येथे गेलो, तासभर वाट पाहिली. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट पत्रकार परिषदेला गेले.त्यामुळे मी सिंचन भवन येथून निघून आलो. माझ्या वैयक्तीक कामासाठी नाही तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्वकल्पना देऊन भेटण्यासाठी गेलो होते. तरीही भेट झाली नाही, ” अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली याचे आम्ही स्वागत करतो, असा खोचक टोला मोहोळ यांनी लावला.जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमध्ये मला जायचे नाही, पण दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्याने आदेश काढून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करणार असल्याचे सांगितले. तरीही पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नव्हता असे मंत्री सांगत आहेत. हे राजकारण सुज्ञ पुणेकर बघत आहेत. भामा आसखेडचे पाणी मिळाले म्हणून खडकवासल्याचे पाणी कपात केले जात आहे, यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा काय संबंध, वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याची टीका मोहोळ यांनी केली.

