मुंबई- नवनीत राणा यांच्यासोबत कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या परवानगीचा निर्णय हा दोन दिवसात होणार आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबत निर्णय घेतील. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करणार असल्याचेही पाटील म्हणाले.ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. खासदार नवनीत राणा यांनी जेलमध्ये आपल्यासोबत हीन वागणुक केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. त्यावर वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.पाटील म्हणाले की, आतापर्यंत झालेली कारवाई ही कायद्यानेच करण्यात आली आहे. राणांना कोठडीत हीन वागणुकीचा प्रकार घडलाच नाही. लोकसभेच्या सचिवांना राज्य सरकार अहवाल पाठवणार आहे. असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
किरीट सोमय्यांवर दाखल झालेल्या FIR वर प्रश्न विचारले असता पाटील म्हणाले की, राज्यात विरोधकांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमय्या यांनी तक्रार दाखल केली तर पोलिस त्याची चौकशी करेल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. असे वळसे पाटील म्हणाले.
नवनीत राणांनी काय केले होते आरोप?
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला होता. या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल 24 तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
‘मातोश्री’ निवासस्थानावर जाऊन हनुमान पठणाचा इरादा केलेल्या राणा दांपत्याविरोधात थेट देशद्रोहाचे कलम 124 -अ लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नवनीत राणांच्या पत्रातील ठळक मुद्दे
- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ‘हिंदुत्व’ तत्त्वांपासून पूर्णपणे भटकली आहे. त्यांनी जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली.
- शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाईन आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘हनुमान चालिसा’ पाठ करेन, अशी घोषणा केली होती. कोणताही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा हेतू नव्हता. खरे तर मी मुख्यमंत्र्यांना ‘हनुमान चालिसा’च्या जपासाठी आमंत्रित केले होते. माझी ती कृती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हती, याचा मी पुनरुच्चार करते.
- माझ्या कामामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते हे लक्षात घेऊन, मी जाहीरपणे यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि जाहीर केले की मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला भेट देणार नाही. पण, त्यानंतरही मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले.”
- मला 23.04.2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मी पोलीस ठाण्यात रात्र काढली. रात्रभर पिण्याचे पाणी अनेकवेळा मागितले. पण, मला पाणी देण्यात आले नाही.
- तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी मी दलित असल्याने मला एकाच ग्लासात पाणी देणार नसल्याचे म्हटलं. हा माझ्यासाठी धक्का होता. अशा प्रकारे, माझ्या जातीच्या आधारावर माझा थेट छळ करण्यात आला आणि केवळ याच कारणासाठी मला पिण्याचे पाणी दिले गेले नाही.
- याशिवाय, मी दलित असल्याने या कारणावरुन पिण्याच्या पाण्यासारखे मूलभूत मानवी हक्क मला नाकारण्यात आले. तसेच मला रात्री बाथरूम वापरायचे असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मला पुन्हा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला सांगण्यात आले की आम्ही खालच्या जातीतील लोकांना आमचे बाथरूम वापरू देत नाही.
मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव सुरूच आहे. आजदेखील मुंबई सत्र न्यायालयाने जामीनप्रकरणी राणांना कोणताही दिलासा दिला नसून सुनावणी पुढे ढकलली आहे. आता 29 एप्रिलला जामिनावर सुनावणी होणार आहे. राणांच्या जामीन याचिकेवर सरकारला उत्तर देण्यासाठी सत्र न्यायालयाने 3 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याचा मुक्काम कोठडीतच राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.