अदाणीला मुंबई विकणे मराठी माणसाची केलेली सेवा नाही
मुंबई-ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘बाळबोध’ टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “जर या युतीमुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नसेल, तर मग त्यावर प्रतिक्रिया का देत आहात? तोंडाची डबडी का वाजवताय?” असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही सगळे एकमेकांची चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
संजय राऊत यांनी भाजपच्या ‘मराठी अस्मिते’च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले? दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता, भाजपच्या एकाही नेत्याने अखंड महाराष्ट्र, बेळगाव-कारवार सीमा प्रश्न किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधी आवाज उठवला आहे का? मराठी माणसासाठी केलेली तुमची केवळ १० कामे आम्हाला दाखवा.”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशन काळात ‘वेगळा विदर्भ’ करण्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “बावनकुळे जेव्हा महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत होते, तेव्हा त्यांच्याविरोधात ठाकरे उभे राहिले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारण्याचे कर्तव्य फडणवीसांचे होते, पण त्यांनी ते केले नाही. मग आता आम्हाला मराठी माणसाच्या गोष्टी का शिकवताय?” असा संतप्त सवाल राऊत यांनी केला.
ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून, त्या लहानशा तुकड्याचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते. पण आम्ही ते होऊ देत नाहीत. मुंबई वेगळी होऊ देत नाही. आम्ही मुंबईला अजुनपर्यंत संघर्ष करून महाराष्ट्रात ठेवले, हीच तुमची पोटदुखी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तुम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केले? मराठी माणसासाठी केलेली दहा कामे दाखवा. गौतम अडाणीच्या घशात मुंबई घालणे म्हणजे महाराष्ट्रासाठी केलेले काम किंवा मराठी माणसासाठी केलेली सेवा नाही, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
आमचे दोन ठाकरे एकत्र आलेत, तुम्ही तुमचे बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही सगळे एकमेकांना चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावत आहात? तुम्ही आमची शिवसेना फोडली हे तुमचे महाराष्ट्राच्या बाबतीत केलेले कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांची संघटना निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एका लफंग्याच्या हातात दिलीत, हे तुमचे मराठी प्रेम? राजकीय मतभेद असतील, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचे पाप तुम्ही केले. यासाठी महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल, असा संताप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
एकनाथ शिंदेंच्या पक्षाची मुले ही अनौरस आहेत. स्वतःची मुले नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. अमित शाह यांनी या पक्षाला आपले नाव दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची मुले सांभाळावीत. भारतीय जनता पक्ष त्यांची मुले पळवणार आहे. कुत्रे पकडण्याच्या गाड्या असतात. तसे पिंजरे भाजपने लावली आहेत. महापालिका निवडणुकीनंतर कुणाची मुले, कोण पळवतंय हे समोर येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

