मुंबई – सायबर क्राईम चे प्रमाण वाढत असून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असा औचित्याचा मुद्दा आमदार शिरोळे यांनी बुधवारी विधीमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.
पोलीसांच्या सायबर विभागात चालू वर्षात सव्वाशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या, मात्र त्यातील फक्त २५ तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
याबाबत अधिक बोलताना आमदार शिरोळे यांनी सांगितले, पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार दोन दिवसांपूर्वी अज्ञाताने फोन करून तुमच्या नावे आलेल्या पार्सल मध्ये ड्रग्ज (मादक द्रव्य) आहेत, तुम्ही तत्काळ पोलिसांना कळवा, असे सांगत फोन ट्रान्सफर करण्याचा बनाव केला. या नंतर तरुणीच्या फोन मध्ये स्काईप ॲप इंस्टॉल करून वैयक्तिक माहितीचा गैरवापर करत सात लाखांची फसवणूक केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये, बाणेर परिसरातील ४२ वर्षीय महिलेसोबत मुंबईचे सायबर डीसीपी बोलत असल्याचे भासवून तिची एक लाखाची फसवणूक केली.
बालेवाडीमध्ये सुद्धा २८ वर्षीय तरुणीला कुरियर कंपनीकडून बोलत आहे, असा फोन आला. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज आहेत असे सांगितले. पार्सल तुमचे नसल्यास पोलिसांना तक्रार द्या असे सुचविले. पोलिसांशी कॉल जोडून देतो असे सांगत व्हेरिफिकेशन करून घेऊ, असे तिला सुचवले. प्रत्यक्षात तिच्या फोनचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि ४ लाख ८० हजार रु परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. ह्या केसमध्ये तर पोलिसांच्या गणवेशात व्हिडिओ कॉल करून, अटक वॉरंट दाखवून, महिलेची फसवणूक केली. अशा घटना सभागृहात सांगून. सायबर क्राईमचे गांभीर्य आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.

