सगळीकडे ट्राफिक जाम , रस्ते खराब आणि टोल वसुली,पथ कर वसुली मात्र जोरात ..
मुंबई-गोवा रस्ता बावायला १७ वर्षे लागतात ?
पुणे-टोलमुक्त महाराष्ट्र करायची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती, त्याचे काय झाले? असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती केला आहे. अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर थांबवल्यानंतर टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना टोल कसले वसूल करता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अमित ठाकरे राजकारणात आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होत असल्याचे ते म्हणाले. टोल नाक्याच्या मुद्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. टोलेच पैसे नेमके कोणाला मिळतात. टोल वसूल करणारा म्हैसकर हा कोणाचा लाडका आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार ही पहिली टीम
शरद पवार यांचे राजकारण मी अनेक वर्षांपासून पाहतोय. ही सर्व मिलीभगत आहे. अजित पवार म्हणजे पहिली टीम आहे. लवकरच दुसरी टीम देखील सत्तेत सहभागी होईल, ते सर्व एकत्र असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. अजित पवार आणि शरद पवार यांची सर्व मिलीभगत असल्याचे देखील राज ठाकरे यांनी सांगितले. अजित पवार यांना जेलमध्ये टाकणारे आज त्यांच्यासोबत एकत्र असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि भाजप यांच्यात युती होणार का? या प्रश्नाला त्यांनी फेटाळून लावले. कोणी कोणाला भेटले तर लगेचच त्यांच्यात युती होत नाही. असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत युतीच्या शक्यता फेटाळल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे मनसेच्या विभाग अध्यक्षांची बैठक घेणार आहेत. ते पक्षाची पुर्नबांधणी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.