अजूनही 100 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
अलिबाग :-रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर दरड कोसळून 25 घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, 98 जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (ता. 20) संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आले आहे.खालापूरजवळील दुर्गम इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडी या छोट्याशा वस्तीवर बुधवारी रात्रीदरड कोसळली. या वाडीतील 48 पैकी 40 घरांवर ही दरड कोसळली. त्यात गाढ झोपेत असलेले 200 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एनडीआरएफ टीम, पोलिस, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका यांच्या टीम बचावासाठी पहाटे पहाटे घटनास्थळी पोचल्या. पण घरावर वीस फूट मलबा असल्याने बचावकार्य करता येत नव्हते. एनडीआरएफच्या चार टीमने युद्धपातळीवर प्रयत्न करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 98 जणांचे प्राण वाचवले. मात्र या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर अजून 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असलेले बचावकार्य नंतर अंधार पडल्याने थांबवावे लागले. आज शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून हे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.
बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी केले.
बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामुग्री व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होती, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले .
ते म्हणाले, बचाव कार्य करताना स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. इथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

