माजी उपमहापौर आबा बागुल यांचे पालिका प्रशासनाला आवाहन
पुणे -पावसाळा सुरु झाला नाही, तोच शहर आणि उपनगरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकवताना छोटे – मोठ्या अपघातांनाही पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. जीव मुठीत घेऊन दररोजचा प्रवास करताना तारेवरची कसरत करणाऱ्या नागरिकांसाठी आता अनुभवी ज्येष्ठ लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे ‘ फक्त पथ विभागाची यंत्रणा ताब्यात द्या मग पहा आमच्या मार्गदर्शनाने खड्डेमुक्त रस्ते ‘ अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पुणे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दरवर्षी करदात्या पुणेकरांचे कोट्यवधी रुपये पालिकेच्या पथ विभागाकडून रस्त्यांच्या निर्मितीसह दुरुस्ती देखभाल यावर खर्च केले जातात.अभियंते आणि कुशल कामगार वर्ग तसेच सर्व यंत्रणा असतानाही सल्लागारांची नियुक्ती करून त्यांच्यावरही कोट्यवधी रुपये पालिका खर्च करत आहे; पण पुणेकरांना चांगले रस्ते मिळणे आजही दुरापास्त झाले आहे.आता पावसाळा सुरू झाला आहे.पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.मात्र त्या अगोदरच शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय झाल्याने पुणेकरांचे हाल होत आहे ; पण त्याचे सोयरसुतक प्रशासनाला नाही हे वास्तव आहे. मग कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अशी अवस्था का आणि कुणामुळे झाली ? हे प्रश्न जितके महत्वाचे आहेत, त्याहीपेक्षा प्रशासनाची कार्यक्षमता आहे की नाही हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे.याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.
पुणेकरांना चांगले रस्ते मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.विशेष म्हणजे पावसाळ्यात त्यांना खड्डेमुक्त रस्ते आवश्यक आहेत.ही बाब लक्षात घेवून ३० वर्षांच्या लोकप्रतिनिधी पदाचा अनुभव असणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या ताब्यात फक्त आपण पथ विभागाची यंत्रणा द्या. शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त रस्ते करून दाखवतो.इतकेच नाही तर त्याची जबाबदारीही स्वीकारतो.अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत, तेही या कामासाठी पुढाकार घेतील अशी ग्वाहीही आबा बागुल यांनी दिली आहे. पावसाळ्यात पुणेकरांचे खड्डेमय रस्त्यांमुळे हाल अपेष्टा टाळण्यासाठी ,त्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्येष्ठ लोकप्रतिनिधींना आता खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी कार्य करण्याची संधी द्यावी.फक्त पालिकेच्या पथ विभागाची सर्व यंत्रणा ताब्यात द्या ,अनुभवी ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्या, मग पहा शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त कसे होतात.असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.