अजित पवारांना अर्थ खाते देण्यास नकार,
फडणवीस वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा
मुंबई- गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात या विषयांवरून मध्यरात्री बैठका घेऊन खल सुरू आहे. मंगळवारी रात्रीदेखील 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावर दोन तास चर्चा झाली. मात्र, अजूनतरी खातेवाटपावर तोडगा निघालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अर्थ, सहकार, सांस्कृतिक, महिला व बालविकास, वस्त्र उद्योग, अन्न व पुरवठा, क्रीडा, पशुसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी कल्याण या खात्यांसाठी आग्रह धरला आहे. तर, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते अजित पवार यांना द्यावे, अशीही मागणी केली जात आहे. मात्र, शिंदे गटाने अर्थखाते अजित पवारांकडे देण्यास विरोध केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाट्याला आलेली दोन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला सोडण्यास ठाम नकार दिल्याची माहिती आहे. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप लांबणीवर पडले आहे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान वर्षावर अजितदादा, शिंदे व फडणवीसांची चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे. परंतु, भाजपने अजित पवार यांना अर्थ खाते देण्याचेच आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीत असताना निधीवाटपावरून आमदारांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेता गेल्या आठवड्यात वांद्रे येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी निधी वाटपात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, ऐवढ्यावरून शिंदे गट मागे हटायला तयार नाही.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिमंडळात सहभागी झाल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार गटामुळे शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे आता कमी होणार आहेत. त्यात महत्त्वाच्या खात्यांवरच अजित पवारांनी आग्रह धरल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असून मंत्रिपद जाणार म्हणून अनेक आमदारांनी आपलील नाराजी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या आमदारांची बैठक घेतली. तेव्हा भाजपसोबत असताना शिंदे गटाच्या वाट्याला आलेली खाती राष्ट्रवादीसाठी सोडू नयेत, अशी मागणी या आमदारांनी केली होती. त्यावर भाजपने मान्य केलेली आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी कोणतेही खाते राष्ट्रवादीला दिले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे समजते.
सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप करावे लागणार आहे. भाजपने अजित पवार यांना अर्थखाते देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. मात्र, शिंदे गटाने याला जोरदार विरोध केला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांकडे अर्थखाते देण्यास शिंदे गटातील आमदारांचा विरोध असल्याचे सांगितले आहे. भाजपने सत्तेत सहभागी होण्यासाठी अजितदादांना अर्थखात्याचेच आश्वासन दिल्याने भाजपची कोंडी झालेली दिसत आहे.