पुणे-पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे. अलीकडेच एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची तिच्याच मित्राने निर्घृण हत्या केली. हे प्रकरण ताजं असताना आणखी एका विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करण्यात आले आहे. यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. त्यांनी ट्वीट करून ही प्रतिक्रिया दिली.
अजित पवार ट्वीटमध्ये म्हणाले,विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.