अहमदनगर-सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन एक तरुण नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ अहमदनगरचा असून संदल मिरवणूक काढण्यात आलेली असताना औरंगजेबाचे पोस्टर्स झळकवत काही युवकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. या देशात, या महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. कोणीही औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी मिळणार नाही.
अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यामुळेच अहमदनगरचे वातावरण खराब करण्यासाठीच अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो झळकवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या पोस्टच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून यातून दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर येथील उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या चौघांचा शोधदेखील पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्याचा सदंल उरुस साजरा करत असताना काही तरुण डीजेच्या तालावर नाचत औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है, अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख, शेख सरवर आणि जावेद शेख या तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी. 505 (2), 298, 34 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वतः पोलीस या ठिकाणी फिर्यादी झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे, तर या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.