पुणे, दि. १७: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध योजनांचे प्रत्यक्ष लाभ वाटपासाठी महसूल यंत्रणेसह ३८ विविध यंत्रणांच्या समन्वयातून येत्या ३० मे रोजी एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात शिबीरे घेण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याबाबतची आढावा बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय अधिकारी, राजेंद्र कचरे, मिनाज मुल्ला, वैभव नावडकर, स्नेहा किसवे, गोविंद शिंदे, पुणे मनपा उपायुक्त नितीन उदास यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती कदम म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानातून जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. महसूल, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, कृषि, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रोजगार, कामगार, नगरविकास, ऊर्जा, सहकार, विविध विकास महामंडळे यांच्या योजनांचा लाभ या शिबीरातून देण्यात येणार आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. लोकप्रतिनिधींना समवेत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावयाचा आहे. उत्पन्नाचे दाखले, रहिवास, वय, अधिवास दाखले, शेतकरी दाखला, रेशनकार्ड वाटप, आधार कार्ड नोंदणी वा दुरुस्ती यासह विविध विभागांचे प्रत्यक्ष लाभ वाटप या दिवशी करायचे असल्याने त्यापूर्वी चांगली पूर्वप्रसिद्धी करावी. जनतेला माहिती द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
000