मुंबई दि. 8 – दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच मला धक्का बसला. निष्पक्ष निडर झुंजार पत्रकार विचारवंत मार्गदर्शक म्हणून बबन कांबळे यांचे योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी पत्रकारितेचा सम्राट हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत संपादक बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पत्रकार संपादक दिवंगत बबन कांबळे यांनी भारतीय दलित पँथर च्या चळवळीला पाठिंबा दिला. वरळी मध्ये ते राहत असताना भारतीय दलित पँथरमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पँथर म्हणून त्यांनी काम केले. ते नवाकाळ मध्ये पत्रकार म्हणून काम करताना त्यांमी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे त्यांनी स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे असते हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याचा निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रात या वृत्तपत्राला वाचक लाभले. बबन कांबळे हे सम्राट ला आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र करण्यात यशस्वी झाले. त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
दिवंगत बबन कांबळे यांच्याशी माझे जिवलग मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गावी ते मला दोन वेळा घेऊन गेले होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेतून भारतीय दलित पँथर पासून आमच्या कार्यक्रमांना आंदोलनांना प्रसिद्धी दिली. माझ्या भूमिकेला वेळोवेळी पाठिंबा दिला.त्यांची अनेक विषयांवर माझ्याशी चर्चा होत असे. बबन कांबळे आणि सम्राट चा माझे नेतृत्व वाढविण्यात मोठा वाटा राहिला आहे.आंबेडकरी चळवळीत सम्राट आणि बबन कांबळे यांचे अढळ आदराचे स्थान कायम राहील असे सांगत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
संपादक ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे आज सकाळी दि 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता ठाणे येथील खाजगी रुग्णालयात वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी; कुणाल आणि कृपाल दोन मुले आणि सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.8 फेब. रात्री 8 वाजता ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ठाण्यातील बाळकुम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.