कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे पदक निश्चित; आता सोनेरी यशाकडे वाटचाल
जबलपूर:
फार्मात असलेल्या सुपरस्टार रेडर अजित चौहान, पृथ्वीराज आणि साहिल पाटीलने गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाचा पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स सेमी फायनल मधील प्रवेश निश्चित केला. वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने गटातील शेवटच्या सामन्यात यजमान मध्य प्रदेश संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ५०-३७ असा तेरा गुणांच्या आघाडीने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह महाराष्ट्र संघाचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. मात्र महाराष्ट्र संघ आता सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे.
महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला. यादरम्यान महाराष्ट्राकडून अजित, पृथ्वीराज आणि साहिल यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे दमदार सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्र संघाने पहिल्या हात मध्येच १३ गुणांची लीड घेतली होती. आपली हीच मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतरही सर्वोत्तम खेळी केली. यातून महाराष्ट्र संघाला धडाकेबाज विजयाची नोंद करता आली.
विजयाच्या प्रयत्नात असलेल्या यजमान मध्य प्रदेश संघाला दादासो पुजारी आणि अनुज गावडे यांनी रोखले. या दोघांनी अचूक पकडी करून यजमानांचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.
यजमान संघ घरच्या मैदानावर अपयशी
यजमान मध्य प्रदेश संघाचा घरच्या मैदानावर कबड्डीत पदकाचा बहुमान मिळवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. घरच्या मैदानावरील सुमार कामगिरीमुळे यजमान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. बलाढ्य महाराष्ट्राच्या सर्वोत्तम खेळीमुळे शेवटपर्यंत मध्यप्रदेश संघाची मोठी दमछाक झाली.
महाराष्ट्र गाठणार फायनल;आज हरियाणा विरुद्ध लढत
गत सत्रातील कांस्यपदक विजेता महाराष्ट्र संघ आता यंदाच्या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक आहे. सोनेरी यशाचा हाच पडला गाठण्यासाठी महाराष्ट्राचा संघ आज बुधवारी संध्याकाळी मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे. यातील विजयाने महाराष्ट्राला फायनल गाठण्याची संधी आहे.
दणदणीत विजयाने किताबाचा दावा मजबूत: दादासो आव्हाड ( प्रशिक्षक )
महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय संपादन करून उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यातील महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली.. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र संघ किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आता उपांत्य सामना जिंकून फायनल गाठण्यासाठी महाराष्ट्र संघाने कंबर कसली आहे. आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आलेले डावपेच यशस्वी करत आहोत. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राला यंदा किताबाचा बहुमान मिळवता येईल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक दादासो आव्हाड यांनी व्यक्त केला.