मुंबई– शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. हा नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायाकडूनही नितेश राणेंना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे. दरम्यान नितेश राणे साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू करण्यात आला होता.