पुणे-दलित पँथरचा प्रमुख कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय संकल्प मेळावा वडगाव शेरीमधील भैरवनाथ चौकात उत्साहात संपन्न झाला . या संकल्प मेळाव्याचे उदघाटन कामगार नेते विजय कांबळे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे , ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते दिलीप जगताप ,दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश मोरे ,विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शुभम सोनवणे ,वाल्मिक सरतापे , विक्रम कांबळे , बाळासाहेब साळवे , नारायण गलांडे ,दलित पँथरचे पुणे शहर प्रकाश साळवे , अरुणा हरपळे , प्रविण रणदिवे , राजू गायकवाड , विकास भोसले , के. टी. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले कि , भीमा कोरेगाव हल्ला मधील मिलिंद एकबोटे , व मनोहर भिडे याना सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले असताना देखील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे हो दोघे अटक झाले नाही . त्यासाठी सरकारची मक्तेदारी मोडून काढायला हवी . त्यामध्ये रामदास आठवले यांनी जातीय वाद्यांशी युती केली आहे . त्यामुळे आंबेडकरी समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही .
यावेळी ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते दिलीप जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , देशात जातीयवादी धर्माध सरकार काम करीत आहे . सर्वोच्च न्यायालयाचा अटक करण्याचा आदेश असताना देखील अटक होत नाही . हे संविधानाचे राज्य आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला . जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम चालू आहे . त्यासाठी आपल्याला यल्गार करावा लागणार आहे . पँथर हा लढायला नेहमी सज्ज असतो . त्यासाठी आपला सर्वाना संघटीत होऊन हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत . जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे दलित पँथर न्याय देण्याचे काम करतो .
यावेळी कामगार नेते विजय कांबळे यांनी सांगितले कि , सगळ्याचे स्मारके झाली परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त करून इंदू मिलच्या जागी स्मारक झालेच पाहिजे . अशी मागणी करून स्मारकाचे उभारणीचे भूमिपूजन झाले परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही . त्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून सामना करावा लागणार आहे . त्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे . यापुढे कामगार राहणार नाही कारण सध्याचे सरकार ट्रेंड युनियन कायदा रद्द करण्याचे काम करीत आहे .
या संकल्प मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रकाश साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन वाल्मिक सरतापे यांनी केले तर आभार विक्रम कांबळे यांनी मानले .