जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस
‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिना’ च्या निमित्ताने प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसानिमित्त भविष्यात जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा आमचा मानस आहे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ज्या प्रमाणे केंब्रिज आणि आयबी सारख्या अनेक संस्था जागतिक स्तरावर कार्य करीत आहेत. त्याच धर्तीवर दर्जेदार मराठी भाषा शिकविण्याचे कार्य करण्याची माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रसिद्ध लेखिका व राज्यभाषा सल्लागार समितीच्या सदस्या श्रीमती स्वाती राजे, लेखिका व कवियत्री सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, मंदा उदय नाईक, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सलील कुलकर्णी व ज्येष्ठ पत्रकार योगेश पाटील उपस्थित होते.
प्रा. राहुल कराड यांनी सांगितले की, मातृभाषेतच प्रत्येक व्यक्तिची मानसिक प्रगती होत असते. त्यांचा भावनात्मक विकाससुध्दा उत्तम प्रकारे होतो. परंतू आज इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा बनली आहे. त्या माध्यमातून उत्तम रोजगार मिळतो. परंतू आता दोन पावले पाठीमागे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी शाळा काढण्याची आमच्यावर वेळ आली आहे. राज्यात शिक्षणसंस्थांचे मोठे जाळे आहे. त्यांच्या आधारे प्रत्येकांनी एक तरी दर्जेदार मराठी शाळा काढाव्या. मराठी बाणा घेऊन कार्य करणारे लोक, तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे व मनसेचेे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे.
स्वाती राजे म्हणाल्या, मातृभाषेला प्राध्यान्य देण्यासाठी सरकारी यंत्रणा, शिक्षक, पालक यांचे कार्य महत्वाचे असून त्यांनी पुढील पिढीवर मातृभाषेचे संस्कार करावेत. त्यांच्यात मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करावी. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या ज्ञानाचे बीज पेरावे.
सौ.उर्मिला विश्वनाथ कराड म्हणाल्या, मराठी भाषेला आपण आश्रय दयावा. प्रत्येकाने घरा घरात या भाषेचा अभिमान बाळगून येणार्या पिढीवर संस्कार करावेत. त्यांना आपल्या भाषेचा गोडवा शिकवून भाषेचे ज्ञान दयावे.
मंदा उदय नाईक म्हणाल्या, जुन्या पिढीत सर्वांचे शिक्षण हे मराठी माध्यमातच झाले आहे. त्यातूनच त्यांनी जागतिक स्तरावर कार्य केलेले आहे. वाढत्या इंग्रजीच्या प्रभावात आम्हाला मराठी भाषेचे जतन करणे गरजेचे असून तिला जिवंत ठेवावयाची आहे.
सलील कुलकर्णी म्हणाले, दोन मराठी माणसेसुध्दा इंग्रजीमध्ये बोलतात. मराठी भाषा बोलताना ती तुच्छतेने बोलली जाते. इंग्रजी मात्र मोठेपणाचे लक्षण आहे. मातृभाषेचा ज्या प्रमाणे दुरावा होत आहे त्यात सर्वात मोठा दोष आमचाच आहे. आपण आपल्या भाषेबद्दल स्वाभिमानी नाही. त्यामुळे भाषा जगविण्यासाठी दर्जेदार मराठी शाळा काढणे काळानुरूप गरजेचे आहे.
योगेश पाटील म्हणाले, मातृभाषा ही प्रेमाची ज्योत पेटविते. यातून शिक्षण घेणे ही अभिमान व गौरवाची गोष्ट आहे. जागतिक स्तरावर ‘२१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. युनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली. भाषा आणि सांस्कृतिक विविधता तसेच बहूभाषेतील प्रेरित करणे हा ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे.