मुंबई-ईडी हि भाजपाची एटीएम मशीन बनली असून दिवाण हाऊसिंग,एसआर वाधवान,अविनाश भोसलेंसह अनेकांना नोटीसा गेल्यानंतर त्यांच्या कंपन्यांकडून वसुली करण्यात आल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे .अशा लोकांच्या कंपन्यांनी इडी च्या नोटीसा आल्यानंतर नवलानीच्या सात कंपनीमध्ये करोडो रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली . संजय राऊत यांनी काल ट्विट करुन याची माहिती दिली होती. यावेळीही ते भाजपाच्या नेत्यांवर शरसंधान साधणार असल्याचं बोललं जात होतं. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपासह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते.“आज मी सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठरावीक लोकांनाच लक्ष का करत आहेत आहे प्रश्न देशभरातून विचारला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे मोठे षड्यंत्र आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.“प्रापतिकर विभागाला आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासोबत ५० नावे पाठवली आहेत. यावर चौकशी करावी असे या तपास यंत्रणांना का वाटत नाही? किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या बोगस कंपन्यांची यादी ईडीला दिली आहे. भाजपाच्या जवळचे असणाऱ्या ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी ईडीकडे पाठवली होती. ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपा नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. ते लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? इनकम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? या सर्व कारवाया कोण नियंत्रीत करत आहे याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.“मागच्या पत्रकारिषदेमध्ये मी सुमीत कुमार नरवर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची संपत्ती आठ हजार कोटींच्यावर गेली आहे. आता ती व्यक्ती मलबार हिलला राहत आहे. ईडीला लावलेल्या चष्म्यातून अशा व्यक्ती दिसत नाही आहेत. याची माहिती मी लवकरच तुम्हाला देईल. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या कोणत्या भाजपाच्या नेत्याची संपत्ती त्याच्याकडे आहे हे मी आधी पंतप्रधानांना सांगणार आणि त्यानंतर तुम्हाला. ट्रायडेन्ट ग्रुपला आधीच्या सरकारच्या काळात महत्त्वाची कामे मिळत होती त्याची माहितीही माझ्याकडे आहे. ही माहिती मी तपास यंत्रणांना देणार आहे. त्यानंतर तुम्ही मला अटकही करु शकता,” असेही संजय राऊत म्हणाले.“ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात तुमचे स्वच्छ भारत अभियान हे कचरा साफ करण्याचे नसून भ्रष्ट्राचार ही नष्ट करण्यासाठी तुमचा जयजयकार होत आहे असे म्हटले आहे. तुमचे विरोधक असणाऱ्यांच्या मागे तुम्ही ईडीची कारवाई लावली आहे. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे,” असे राऊत म्हणाले.“जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांनी १०० पेक्षा अधिक विकासकांकडून वसुली केली आहे. ज्यांची ज्यांची ईडीने चौकशी केली आहे त्या सर्वांनी त्यांचे पैसे जितेंद्र नवलानीच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केले आहेत. जितेंद्र नवलानी ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी काम करत आहेत. २०१७ मध्ये ईडीनं दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. अचानक दिवाण हाऊसिंगकडून जितेंद्र नवलानीच्या खात्यात २५ कोटी ट्रान्सफर झाले. मग ३१ मार्च २०२० पर्यंत एसआर वाधवान यांच्या कंपनीकडून नवलानींच्या कंपनीमध्ये आणखी १५ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. याचप्रकारे अविनाश भोसलेंची चौकशी झाली. त्यानंतर अविनाश भोसलेंकडून १० कोटी रुपये नवलानीच्या सात कंपनीमध्ये ट्रान्सफर केले गेले. ईडीची चौकशी सुरु होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. ईडीच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांचा नवालांनींसोबत काय संबंध आहे? आणि पैसे ट्रान्सफर का होत आहेत?,” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.“मुंबई पोलिसात आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. देशातल्या या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची तपासणी आजपासून मुंबई पोलीस करणार आहेत. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. मार्क माय वर्ड. ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.