मुंबई-देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ आज संपत आहे. या निमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी दुपारी माध्यमांसमोर येऊन भाजप, राणे कुटुंब, केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. सीबीआय, ईडी यांसारख्या एजन्सीची भीती केंद्राने 24 तासांसाठी दूर करावी, आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ, असे महापौर म्हणाल्या आहेत.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, जोपर्यंत मुंबईला नवा महापौर मिळत नाही तोपर्यंत मी मुंबईची सेवा करत राहणार आहे. जेव्हा मी महापौर झाले तेव्हापासूनच मनात होते की जेव्हा आपण सुखात पुढे राहतो, तेव्हा दु:खातही पुढे असायला हवे. हाच विचार करून मी पाच वर्षे काम केले. त्या पुढे म्हणाल्या की, कोविडच्या वेळी जेव्हा कोणी हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत होते. तेव्हा मी कोविड केंद्रांवर जाऊन रुग्णांची स्थिती जाणून घेतली.
किशोरी पेडणेकर यांचा केंद्रावर निशाणा
दिशा सालियन प्रकरणी राणे कुटुंबीयांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सीबीआयला द्यावेत. ते म्हणतात की, 24 तास पोलिसांना हटवले तर ते आम्हाला दाखवून देतील के ते काय चीज आहेत. आम्ही त्यांना 24 तास ईडी आणि सीबीआयला हटवायला सांगतो, आम्ही काय आहोत ते देखील दाखवून देऊ. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे लोक ज्यांच्यावर कारवाई करतात, ते भाजपमध्ये येताच स्वच्छ होतात. मात्र, आम्ही लोकशाही मार्गाने काम करतो आणि यापुढेही करत राहू, असेही महापौर पुढे म्हणाल्या.
मला माझ्या कामासाठी पुरस्कार नको आहेत
त्या म्हणाल्या की, गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. उद्यापासून आमची नवी इनिंग सुरू होत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या याबद्दल मी देवाचे आभार मानते. मी चांगलं काम केलं आणि त्यासाठी मला पुरस्कार मिळायला हवा असं मी म्हणत नाही. हे माझे कर्तव्य होते जे मी केले. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या. माझ्या प्रदीर्घ कार्यकाळात माझ्यावर कोणीही आरोप केलेले नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अचानक येऊन माझ्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.
जोपर्यंत नवीन महापौर मिळत नाही तोपर्यंत मुंबईचा चार्ज माझ्याकडे
त्या पुढे म्हणाल्या की, ‘मुंबईकर शिवसेनेच्या पाठीशी आहेत आणि यावेळीही बीएमसीमध्ये भगवाच फडकणार आहे. दुसरा महापौर येईपर्यंत मी काळजीवाहू महापौर राहणार आहे. मुंबईत कुठेही काही झालं तर तिथे जाईल.
दिशा प्रकरणात पुरावे असतील तर राणेंनी सीबीआयकडे द्यावे
दिशा सालियन प्रकरणावर महापौर किशोरी म्हणाल्या, ‘मालवणी पोलिस ठाण्यात दीर्घ चौकशी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, दिशा सालियनच्या आईकडे महापौर आणि महिला आयोगाचे लोक गेले होते. ते म्हणाले की, आम्ही त्यांना चिथावणी दिली, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. आम्ही कोणालाही भडकावलेले नाही. ते म्हणतात की, त्यांच्याकडे पुरावे आहेत, तर त्यांनी ते सीबीआयला द्यायला हवेत. ते का थांबले ते मला समजत नाही. सीएम साहेबांनी त्यांना फोन केल्याचे राणे म्हणतात, पण हे सर्व निराधार आहे.