४ मार्च १८०४ रोजी यशवंतरावांनी लेकला लिहिलेल्या पत्रात म्हटले, : “माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खोगिरावर आहे. ज्याही दिशेला माझ्या पराक्रमी सैनिकांचे घोडे वळतील त्या दिशेचा सर्व देश आम्ही जिंकुन घेवु. जर तुम्ही शहाणे आणि विचारी असाल तर माझे प्रतिनिधी सांगतील त्या महत्वाच्या विषयांचा आधी फडशा पाडाल…” जनरलल लेकला असे सुनावणारा भारतात कोणी भेटला नव्हता. जनरल लेकने २२ मार्च १८०४ रोजी वेलस्लीला पत्र लिहुन यशवंतरावांविरुद्ध युद्ध सुरु करण्याची काकुळतीने परवानगी मागितली. या पत्रात लेक म्हणतो- “जर होळकरला आत्ताच नष्ट केले नाही तर पावसाळ्यानंतर तो कमालीचा उपद्रवी ठरेल. या राक्षसाने मला जेवढे अस्वस्थ केले आहे तसे कधीही कोणी केले नसेल. हा माणुस इंग्रजांचा सर्वात घातक शत्रु आहे यात शंका बाळगु नये. अशा दरोडेखोराचे कौतुक करतांना मला संकोच वाटतो आहे. तो स्वत: माझ्यावर चालुन येणार नाही, असेच दडपण वाढवत राहील…आणि जर मी त्याच्यावर चालुन गेलो तर तो हुलकावन्या देत सरळ आपल्याच प्रदेशांत घुसुन वाटेत आडवे येईल ते उध्वस्त करत पुढे जाईल…”. हे पत्र वाचून गव्हर्नर वेलस्लीने १६ एप्रिल १८०४ रोजी वेलस्लीने यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध घोषित केले आणि जनरल लेकला यशवंतरावांवर शिस्तबद्ध चढाई करण्याची परवानगी दिली. युद्ध सुरु होळकर तयारीत होतेच. ते किंबहुना या क्षणाचीच वाट पहात होते. बुंदेलखंडात कुचजवळ कर्नल फॉसेटचा आठ हजार सैन्याचा तळ होता. युद्ध त्यांनी घोषित केले असले तरी पहिला आघात यशवंतरावच केला. त्यांनी फॉसेटच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सोबत अमिरखान व पाच हजार पेंढारी घेवुन त्यांनी फॉसेटच्या तळावर अचानक धाड घातली आणि त्याच्या जवळपास दोन बटालियनची भिषण कत्तल केली. फॉसेट घाबरुन जो पळत सुटला तो बेटवालाच जावुन पोहोचला. त्याच्या अनेक तोफा आणि युद्धसामग्री या युद्धात यशवंतरावांच्या हाती लागली. ही लढाई २२ मे १८०४ रोजी झाली. मुकंद-याचे युद्ध: भर पावसात २५० मैलांचा झंझावाती पाठलाग….मोन्सनच्या सेनेचा पुरता खात्मा… यशवंतरावांचे हे युद्ध आठवले की इंग्रजांना धडकी भरते. युद्धनीतीचा वेगळाच रयोग यशवंतरावांनी या युद्धात केला. मॉन्सनची बलाढ्य फौज जयपुरवरुन यशवंतरावांवर चाल करुन निघाली होती. येतांना त्याने होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन घेतला. विवक्षीत ठिकाणी त्याच्या व मरेच्या फौजेची गाठ पडणार होती. सर्व फौजा एकत्र येताच होळकरांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. पण ती योजना यशस्वी होवू देतील ते यशवंतराव कसले? यशवंतरावांनी ते एकत्र येण्याआधीच मॉन्सनला तोंड दाखवले, किरकोळ चमक केली आणि सरळ माघार घेतली. मॉन्सनला वाटले, यशवंतराव घाबरले, त्याने यशवंतरावांचा पाठलाग सुरु केला. वाटेत अधुन मधुन यशवंतराव त्याच्याशी किरकोळ चकमक करीत आणि पुन्हा पळत सुटत. मॉन्सनने मुकुंदरा घाटही ओलांडला. यशवंतराव सामोरे न येता त्याला पाठ दाखवत आपल्या प्रदेशातच घुसत राहिले. मॉन्सनला आपण या नादात सापळ्यात अडकत आहोत याचे भानच आले नाही. त्याला वाटले कि यशवंतराव घाबरुन पळत आहेत. मुकुंद-यापासुन ५० मैलावर असलेला हिंगलेशगढही त्याने जिंकुन घेतला. होळकरांनी तेथेही कसलाही प्रतिकार केला नाही. येथे एक वेगळीच गंमत झाली. ज्या दिशेने यशवंतराव चालले होते नेमक्या त्याच दिशेला मरेचा तळ होता. त्यामुळे मरेला वाटले कि यशवंतराव आपल्यावरच चालून येत आहेत. मरे व मॉन्सनमधील दळण-वळण यशवंतरावांनी पार तोडून टाकले होते त्यामुळे मॉन्सन यशवंतरावांच्या पाठीशी आहे हे त्याला समजलेच नाही. मरे अद्याप एकट्याने युद्ध करण्याच्या तयारीत नव्हता. तो अजून माघारी सरकत गेला. या पाठलागाच्या नादात मॉन्सनजवळ आता फार तर दोन दिवस पुरेल एवढा शिधा उरला. त्यात पावसाळा सुरु झाला. चंबळ नदी पुराने दुथडी भरुन वाहू लागली. आता चंबळेकाठी भर पावसात उपाशीपोटी युद्ध करणे किंवा मागे हटणे हेच काय ते पर्याय त्याच्यासमोर उरले. त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने नाईलाजाने न लढताच कॅप्टन ल्युकान या अधिका-याजवळ जड सामान देवुन परत वेगाने मुकुंदरा खिंडीकडे माघारी वळायचे मोन्सनने ठरवले. बहिरी ससान्याने संधी मिळताच भक्षावर धाड घालावी तसे मॉन्सन चंबळकाठावरून हलताच यशवंतरावांनी पुर्ण शक्तीनिशी ल्युकानच्या सैन्यावर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा भिषण होता कि ल्युकानचा एकही सैनिक वा बुणगा वाचला नाही. सर्वांना कापुन काढले गेले. . आता स्थिती बदललली. आता मोन्सन पळत सुटला तर शिका-यासारखे आपल्या घोडदळासह यशवंतराव त्याच्या मागे लागले. यशवंतरावांचे पायदळ व तोफा मागुन येत राहिल्या. हा पाठलाग चालला तो अडिचशे मैल…भर पावसात आणि गालाने भरलेल्या प्रदेशातून. मॉन्सनची गाळण उडाली. तो आग्र्याच्या दिशेनं पळत सुटला. यशवंतराव त्याच्यावर दमादमाने हल्ले करत त्याचे सैन्य कमी करत राहिले. बियास नदीच्या किनारी त्याचे निम्मेअधिक सैन्य कापले गेले. तेहून तो पळत सुटला तर त्याला पुन्हा यशवंतरावांनी कुशलगढजवळ गाठले. तेथे उरलेल्या सैन्यातीत दीड हजार सैनिक मारले गेले. तेथुनही तो पुन्हा जीव वाचवत पळत सुटला. पण आताचे पलायन सोपे नव्हते. मॉन्सनचे सैन्य घाबरले होते. एरवी इंग्रजी कंपू सैन्यात असलेली शिस्त प्रथमच मोडली होती. होळकरांची फौज पाठलाग करता करता गोळीबाराचा भडिमार करत होती. कोठे थांबले कि तोफांचा भडिमार होत होता. त्यात विनाश पाहून अनेक अधिकारी मोन्सनलाही सोडुन पळुन जायला लागले. बुणगे आणि सैन्यात सरमिसळ होवु लागली. गावा-खेड्यातील नागरिकही मोन्सनच्या पळत्या सैन्यावर हल्ले करु लागले. दगडफेक करू लागले. फतेहपुरला मात्र यशवंतराव होळकरांनी मोन्सनवर भिषण आणि अंतिम हल्ला चढवला. मॉन्सनला शरणागती पत्करण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. अडिच महिना चाललेल्या भर पावसाळ्यातील या प्पाठलागात त्याचे जवळपास १० हजार सैनिक आणि २ ते ३ हजार बुणगे ठार झाले होते. एवढा अवमानस्पद पराभव इंग्रजांचा कधीच झाला नव्हता. पावसाळ्यात मराठी सैन्य सुस्त असते, लष्करी हालचाली करत नाही हा जो काही फाजिल आत्मविश्वासात व गैरसमजात जनरल जेरार्ड लेक होता तो धुळीला मिळाला होता. एखाद्या सावजाला दमादमाने दमवुन मारावे तसे मोन्सनच्या बलशाली सैन्याचे झाले होते. २८ आगस्ट १८०४ रोजी हा महाविजय, तोही इंग्रजांविरुद्ध यशवंतरावांनी मिळवला. मॉन्सन ३० आगस्टला जगल्या-वाचल्या २-३०० सैनिकांसह आग्र्याला पोहोचला… पराभुताच्या स्वागताला कोण येनार? जनरल वेलस्ली या भिषण पराभवाची वार्ता ऐकुन हतबुद्ध झाला होता. यशवंतरावांविरुद्ध केलेली सर्व व्युहरचना अंगलट आली होती. यशवंतरावांनी दळणवळणच तोडले असल्याने लेक किंवा मरे मॉन्सनला कसलीही मदत पोहोचवू शकले नव्हते. जी हानी व्हायची ती झाली होतीच…पण संभाव्य हानी आता कशी टाळायची याचीच विवंचना त्याला जास्त लागुन राहिली होती. त्याने अक्षरश: हादरुन एका पत्रात लिहिले…”You will have heard of Monson’s reverses: I tremble for the political consequences of these events.” (मोन्सनच्या पराभवाचे राजकीय परिणाम काय होतील या विचारानेच मला थरकाप सुटला आहे.) पराभव माहित नसलेल्या इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य तर खचलेच पण त्याचे पडसाद इंग्लंडमद्धेही उमटले. पहिल्यांदाच या पराभवाने इंग्रजांनी माती खाल्ली. त्यांचा लष्करी माज पुरेपुर उतरला. त्यांची जगज्जेत्या लष्कराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यांचे सारे बेत उधळले गेले. या पराभवामुळे आता भारतीय रजवाडे यशवंतरावांच्या बरोबर जाणार अशी शंका त्यांना छळु लागली……