मुंबई-कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेच्या बसने 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 49 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इलेक्ट्रिक वाहन होते. कुर्ला स्टेशनहून येणाऱ्या या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. अर्पण हाॅस्पिटलजवळ त्याचे नियंत्रण सुटले व सुमारे 500 मीटरपर्यंत त्याने रस्त्यावरील 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात पाच ते सहा ऑटो रिक्षांचा चक्काचूर झाला.
या आपघातातील आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. हा अपघात आहे की, कट याचा तपास बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. त्या आधारावर न्यायालयाने आरोपी 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.आरोपी चालक संजय मोरे सोमवारी पहिल्यांदाच ही बस चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी तो मिनी बस चालवत होता अशी माहिती आहे. 1 डिसेंबर रोजीच ते बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून रुजू झाला होता. त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे समजते आहे. त्यामुळेच हा अपघात झाला.
शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे म्हणाले की, कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालक घाबरला आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सलेटर दाबला, त्यामुळे बसचा वेग वाढला.अचानक अनियंत्रित झाल्याने क्षणार्धात काय झाले हे चालकालाही कळले नाही. एका कोपऱ्यात जाऊन बस धडकल्यानंतर जमावाने त्याला खाली ओढले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले. तो खरेच दारू प्यालेला होता का, याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवान मदतीला धावून आले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, या मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक अनियंत्रित झालेली बस बाजारपेठेत घुसली. दिसेल त्या वाहनाला तिने चिरडले. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले. सुमारे 500 मीटरपर्यंत ही बस गाड्या चिरडत होती, नंतर एका कोपऱ्यात जाऊन धडकली. परिसरातील लोकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र बचावकार्यासाठी एक तासाने रुग्णवाहिका आली. तोपर्यंत नागरिकांनी आपापल्या वाहनांनी जखमींना रुग्णालयात नेले होते. या तातडीच्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.