आंतरवाली सराटी-मी खरच सांगतो पूर्वीचा मराठा राहिला नाही. चालू असलेल्या अधिवेशनाची मूदत वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या, सरकारने आमचा अंत पाहू नये, अन्यथा सरकारला आमचे आंदोलन झेपवणार नाही. मग सरकारला देखील चांगलेच महागात पडेल, त्यांना असे वाटेल की, त्यावेळी निर्णय घेतला असता तर बरं झाले असते. आमचे आंदोलन त्यांना कधीही परवडणारं नाही. आमचे गनिमी कावे त्यांना आत्ताच सांगणार नाही. सरकारने विनाकारण आमचा अंत पाहू नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारने ध्यानावर येऊन भावना समजाव्या
जरांगे पुढे म्हणाले की, सरकारने ध्यानावर येऊन मराठा समाजाच्या भावना समजून घ्या, ही समाजाची खदखद आहे. ही संयमाची भावना सरकारने समजून घ्या, जर समाजाची खदखद बाहेर पडली तर कोणालाही परवडणारे नाही. आता समाजापेक्षा जातीपेक्षा कोणालाच मोठं समाज समजत नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठं मानायचं नाही, असे समाजाने ठरवले आहे. त्यामुळे सरकारने ही भावना समजून घ्यावी, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. विनाकारण मराठ्यांना त्रास दिला तर समाज आता ऐकणार नाही. हे देखील सरकारने समजून घ्यावे.
..तर परिणामी आमचा नाईलाज राहणार नाही
जरांगे म्हणाले की, भुजबळांचे ऐकून सरकारने आमच्या मराठा समाजाला अडचणीत आणू नये. एका व्यक्तीच्या ऐकून तुम्ही आमचे नुकसान करु पाहत असाल तर त्याला आमचा नाईलाज राहिल. मग मात्र आम्ही मागे हटणार नाही, अजिबात नाही म्हणजे नाही, असे म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. तर सरकारला देखील सावध होण्याचा इशारा दिला. आधी मराठ्यांना आरक्षण द्या, त्यानंतर टक्केवारी वाढवायची की नाही तो निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.
भुजबळ मराठा-ओबीसीत वाद लावतो
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा तोंडसूख घेतले. भुजबळ मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. भुजबळ त्यांची राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंजारी, आणि धनगर समाजाला मराठ्यांविरोधात भडकविण्याचा प्रयत्न भुजबळ करत असल्याची टीका त्यांनी केली.
जरांगे म्हणाले की, किती दिवस सरकार मराठ्यांना झुलवत ठेवणार आहे. त्यामुळे समाजाला दिशा ठरवावी लागणार आहे. आई ओबीसी असले तर ती जात मुलांना लावा. मराठवाडा-विदर्भातील मराठे एकच असल्याचे ते म्हणाले. आरक्षण न दिल्यास 24 डिसेंबर रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, यावर मी ठाम आहे.