नागपुर-एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत.या वर्षी ऑगस्टमध्येही या कंपनीला आग लागली होती. त्यावेळी कचऱ्यात स्फोट झाला त्यात दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.या घटनेला पाच महिनेही उलटले नव्हते इतक्यात रविवारी मोठा स्फोट झाला.
सोलर ग्रुपद्वारे चालवले जाणारी इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड ही कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादकांपैकी एक आहे. सध्या येथे भारतीय लष्कर आणि नौदलासाठी विविध शस्त्रे तयार केली जातात. तसेच या कंपनीच्या माध्यमातून भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रे निर्यात केली जातात.
रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात हा स्फोट झाला. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट झाला आहे.
या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. तर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले आहे.