जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘मनाच्या कथा आणि व्यथा’ विशेष कार्यक्रम
पुणे: “मन म्हणजे मेंदूच्या क्षमतेचा आपली वर्तणूक, आकलन, स्मरणशक्ती, भावना यांच्यावर असलेला प्रभाव होय. मेंदू हा शरीराचाच भाग असल्याने मनोविकरांची लक्षणे आपल्या वर्तणुकीतल्या बदलांनी किंवा अन्य शारिरीक व्यथांद्वारे प्रकट होतात. रक्तदाब, छातीतली धडधड, निद्रानाश अशी ही लक्षणे असू शकतात. ही लक्षणे मानसिक आजारांमुळेच दिसत आहेत का, हे तज्ञांकडून तपासून घ्यावे लागते. मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्यात कसलाही कमीपणा मानू नये. किंवा संकोच करू नये. मनाच्या आजारांचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच उपचार घेणे महत्वाचे असते,” असे मत विज्ञान अभ्यासक व आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद व भावार्थ यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘मनाच्या कथा आणि व्यथा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्वे रस्त्यावरील भावार्थच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनोवैज्ञानिक भूषण सुकेशिनी वामनराव, आणि मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष विनय र. र. आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बोरकर यांनी मानसिक स्वास्थ्यावरील आपल्या ‘त्या बुधवारी’ या कथेचे अभिवाचन केले. भूषण यांनी मनोविकारापासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? यावर भाष्य केले.
डॉ. विद्याधर बोरकर म्हणाले, “आपल्याला आलेले अनुभव, भेटलेली माणसे सतत काही तरी शिकवत असतात. त्यातून आपण अधिक सक्षम बनत असतो. मन आजारी पडू शकते, या गोष्टीचा स्वीकार करायला हवा. मानसिक तणावाचे गांभीर्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक तणाव जाणवत असेल, तर लवकरात लवकर उपचार घ्यावेत. ध्यान हे मनाचे खाद्य आहे. ध्यान म्हणजे कोणतीही गोष्ट सजगपणे करणे. जाणीवपूर्वक एखाद्या चांगल्या कृतीत मन रमवणे. मनाला शांत करणारी ध्यान ही एकमेव गोष्ट आहे”
ताप आला, अंग दुखले, अशा शारीरिक आजारांसाठी आपण औषधोपचार करतो. कारण शारीरिक आजारांबद्दल समाजात माहिती आणि जागरुकता आहे. मात्र मानसिक अस्वास्थ्याबद्दल समाजात जागरुकता नाही. सत्यजित बेडेकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मन मनास उमगत नाही’ हे गीत सादर केले. तर कार्यक्रमाचा समारोप कबीरांच्या भजनाने केला. आभार अंजली साठे यांनी मानले.