- चंद्रकांत दळवी यांची भावना; विचारवेध संमेलनात ‘रयतेपासून रयतेपर्यंत’वर प्रकट मुलाखत
पुणे: “कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी खेडोपाडी उभारलेल्या शाळांमुळे गोरगरीब घरातील मुलामुलींना शिकता आले. माझेही शिक्षण अण्णांनी उभारलेल्या ‘रयत’मध्येच झाले. तिथेच माझी जडणघडण झाली. रयतेच्या कल्याणासाठी जगण्याचा संस्कार घेऊन प्रशासकीय सेवेत असताना, तसेच सेवापूर्तीनंतर ‘रयते’साठी योगदान देता येतेय, याचे समाधान आहे,” अशी भावना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली.
बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयत विचारवेध संमेलनात चंद्रकांत दळवी यांची प्रकट मुलाखत झाली. साहित्यिक प्रा. शंकर आथरे व कवयित्री संगीता झिंजुरके यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अरुण आंधळे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत दळवी म्हणाले, “आजोबा वारकरी संप्रदायात, तर वडील लष्करात असल्याने समाजाप्रती बांधील राहण्याचे संस्कार मिळाले. ‘रयत’मध्ये असताना समता, बंधुता, स्वावलंबन आणि समर्पण आत्मसात केले. प्रशासकीय सेवेत आल्यावर रयतेच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर दिला. सामान्यांचे, वंचितांचे व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, स्वच्छ प्रशासन व वेळेत सेवा देण्यासाठी काम केले. लोकांचे कल्याण हाच विचार मनात असायचा. कारण तो रयत शिक्षण संस्थेत असताना खोलवर रुजलेला होता. ‘झिरो पेंडन्सी’सारखे उपक्रम राज्यातील जनतेच्या हिताचे ठरले. सेवेत असताना सर्वांशी बंधुभाव जोपासल्यानेच आजही लोकांचे प्रेम मिळते. बंधुता परिवाराशी जोडल्याने बंधुतेचा विचार आणि अण्णांनी दिलेला समतेचा विचार घेऊन सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे.”
“उपजिल्हाधिकारी झालो, त्याचवेळी माझ्या गावातील शाळेला नववीपासूनचे वर्ग बंद करण्याचे आदेश मिळाले होते. पण लोकांच्या सहभागाने आज ही शाळा सर्वोत्तम बनली आहे. महसूल खात्यात काम करताना ई-महाभूमी उपक्रमाने जागांच्या नोंदी सुलभ झाल्या. संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना अशा उपक्रमांतून समाजपरिवर्तन झाले. आपल्या कार्यकाळात रयतेसाठी अनेक योजना राबवल्या आणि त्याचा लाभ त्यांना झाला, याचे समाधान आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून रयत शिक्षण संस्थेशी जोडला गेलो. व्यवस्थापन सदस्य म्हणून सुरुवात करून विविध पदांवर काम केल्यानंतर आता संस्थेचा चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. जिथे शिकलो, त्याच संस्थेचा चेअरमन होणे, ही गोष्ट अभिमानास्पद आणि आनंद देणारी आहे,” असे चंद्रकांत दळवी यांनी नमूद केले.
प्रकाश रोकडे यांनी अध्यक्षीय समारोपात रयतेपासून रयतेपर्यंतचा प्रवास उलगडताना प्रशासकीय अधिकारी कसा, असावा याचे दर्शन चंद्रकांत दळवींच्या रूपात घडत असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेने कायमच समता आणि बंधुतेची शिकवण विद्यार्थ्यांना दिली आहे. आजच्या या अस्थिरतेच्या काळात स्वातंत्र्य, न्याय यासोबतच समता आणि बंधुतेची तीव्रतेने गरज आहे. हाच विचार घेऊन आपण पुढील वाटचाल करत राहायला हवे.
तत्पूर्वी, दुपारच्या सत्रात पल्लवी उमरे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी काव्यसंमेलन झाले. ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी यांच्यांसह निमंत्रित कवींनी यात सहभाग घेतला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रभंजन चव्हाण, बंडोपंत कांबळे व प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनी आभार मानले.