सिन्नरकारांच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्ताचा कलंक पुसणार;
सिन्नरकरांनी मानले उपुमख्यमंत्री अजित पवार यांचे आभार
मुंबई, दि. 14 :- उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी उपयुक्त ठरणारा ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली. हे दोन्ही नदीजोड प्रकल्प 15 हजार 710 कोटी रुपयांचे असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याला होणार असून सिन्नर तालुक्याच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्ताचा कलंक पुसला जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सिन्नरचे आमदार माणिकराव काकाटे यांच्यासह सिन्नरकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
याबाबत अधिक माहिती अशी, आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदी जोड प्रकल्पासाठी 13 हजार 497 कोटी 24 लाख रुपये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 160.97 दलघमी पाणी उपलब्ध होणार असून 33 हजार 110 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पासाठी 2 हजार 213 कोटी 53 लाख रुपये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 100 दलघमी पाणी उपलब्ध होणार असून 12 हजार 998 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्याचे चित्रपूर्णपणे बदलणार असून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन सातत्याने याबाबचा पाठपुरावा केला होता. सातत्याने या बाबतच्या बैठका मंत्रालयस्तरावर घेण्यात आल्या होत्या. हे नदीजोड प्रकल्पमार्गी लागल्यामुळे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह सिन्नरकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.