पुणे, दि.13 : . पुणे शहरात मेट्रो आली, नदीसुधार प्रकल्प सुरु आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात नुसती भूमिपूजन झाली पण मोदी सरकार प्रत्यक्षात प्रकल्प साकारत आहेत. त्यामुळेच शहराचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे मत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे उद्यान येथे विकसित करण्यात आलेल्या कलाग्रामचे लोकार्पण मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, दीपक मिसाळ, धीरज घाटे, करण मिसाळ, श्रीकांत जगताप, किरण ठाकूर यांची उपस्थित होते. वास्तूरचनाकार तीर्था मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.
मोहोळ म्हणाले, आपलं पुणे ही जशी सांस्कृतिक नगरी आहे, तशीच ती कलाकारांची ही नगरी आहे. कलाकरांना आपले कलाविष्कार सादर करण्यासाठी विविध व्यासपीठे पुण्यनगरीने उपलब्ध करुन दिलेली आहेत. आणि आता याच पुण्यनगरीत कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ असणारं ‘कलाग्राम’ नक्कीच मोठा आधार ठरणारं आहे. या ‘कलाग्राम’च्या माध्यमातून विविध कलाविष्कार सादर करण्याची संधी कलाकारांना मिळणार असून कलाकारांना आपले कलाविष्कार लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होणार आहे. अतिशय भव्य-दिव्य अशा या कलाग्राममुळे पुण्याच्या कला विश्वात वैभवात निश्चितच भर पडली आहे. शिवाय यामुळे पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. ‘कलाग्राम’ साकारल्याबद्दल माधुरीताई आणि महापालिकेचे विशेष अभिनंदन !
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, सिहंगड रोड ला 50 एकर जागा यामध्ये पहिल्या फेजमध्ये पु. ल. देशपांडे उद्यान झाले, आता कलाग्राम झाले म्हणजे पूर्ण 50 एकर विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे पु. ल. देशपांडे कट्टा विकसित केला जाईल. ज्यामध्ये पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित कला, साहित्याचे सादरीकरण करण्यात येईल.
मिसाळ म्हणाल्या, बांबू दगडांपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आणि ग्रामीण कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांसह विविध राज्यांमधील लोककला आणि खाद्यपदार्थांची मेजवानी पुणेकरांना एकाच शताकाली येथे उपलब्ध होणार आहे. कलाग्रामचा परिसर बांधकाम एखाद्या गावातील वास्तूप्रमाणे साकारण्यात आले आहे. या ठिकाणी तीस गाळे बांधण्यात आले असून, त्यात एक अँमफी थिएटर, विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रीचे काउंटर, लायब्ररी, विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉल, विविध प्रकारच्या कार्यशाळासाठी खुली व्यासपीठे, तसेच बांबू व दगडापासून तयार केलेल्या विविध वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.
प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले.
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.