नवी दिल्ली -येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले,’ राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे. सशस्त्र माओवादी कॅडरची २०१३ मधील ५५० ही संख्या २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गत ६ वर्षात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले, १६१ पकडले गेले तर ७० जणांनी आत्मसमर्पण केले.माओवाद्यांची पुरवठा साखळी राज्याने तोडली आहे. प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या त्यांच्या विस्तारास मोठा धक्का बसला आहे. एकाही व्यक्तीची #माओवादी संघटनांत नव्याने भरती झाली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही.
नक्षलग्रस्त भागात रस्ते #पायाभूत सुविधा, इंटरनेट नेटवर्क, उद्योग, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात प्रभावी विकास कामे झाली आहेत. #कोनसरी येथे २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह लॉयड मेटल्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार झाला आहे. यामुळे सुमारे १० हजार लोकांना रोजगार मिळेल.सूरजागड इस्पात लिमिटेड १० हजार कोटी रुपये खर्चून अहेरी तहसीलमध्ये एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करणार आहे. यामुळे आणखी सात हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आदिवासी तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने गडचिरोलीमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि प्रशिक्षण यासाठी एक अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र वर्षाला ४८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे