नवी दिल्ली- खासदार संजय राऊत यांनी गौतम अदानी हे भाजपचे उद्योगपती जावई आहेत. आणि भाजपच्या या जावयाला मुंबई गिळायची आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला. असे असले तरी त्यांना तसे करु देणार नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्या शनिवारी 16 डिसेंबर रोजी धारावी बचाव मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
धारावी विकास प्रकल्पावरुन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. धारावीच्या बचावासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा मोर्चा फक्त धारावीसाठी नाही तर मुंबईकरांसाठी असल्याचेही ते म्हणाले. मुंबईवर आणि इतर सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचे काम सुरु आहे. देशाच्या उद्योगपती जावयांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी बचाव मोर्चा होणारच आहे. या मोर्चात मुंबईकर उपस्थित राहतील असा विश्वास देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने जागावाटप झाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय असल्याची माहितीही त्यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणे शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग देशासाठी महत्वाचा असल्याचेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात 40 प्लस जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष डमरू वाजवत बसले
राज्याचे दोन उपमुख्यमंत्री कशा करता दिल्लीत येत आहेत माहीत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत असतील. बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत. राज्यातील सरकार अस्थिर असल्याचा दावाही त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांचे सरकार घटनाबाह्य असून न्यायालयात तारखा पडून घेतल्या जात असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर डमरू वाजवत बसले आहेत. एक फुल दोन हाफ सरकार… दिल्लीत येऊन काय करणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार अपात्रतेच्या निर्णयाची मुदत 30 डिसेंबरऐवजी वाढवून देण्याची मागणी विधिमंडळाने न्यायालयात केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. विधानसभा अध्यक्ष डमरू वाजवत बसले असल्याचे ते म्हणाले.