धकाधकीच्या काळात स्थिर, शाश्वत जीवनासाठी वाचन आवश्यक – ल. म. कडू
पुणे – गुलाबी थंडीच्या दिवसात पुण्यात महोत्सावांची रेलचेल असते. यंदा त्यात पुणे पुस्तक प्रदर्शनाने मोलाची भर टाकली आहे. या प्रदर्शनाच्या पूर्वदिनी आज लोकसेवा ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक” असा संदेश देत बाल साहित्य दिंडीने बालभारतीच्या प्रांगणातून प्रस्थान ठेवले. दिंडीची सुरूवात करताना साहित्य कला अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिकांनी सर्वांना वाचनाचे महत्व सांगत बाल साहित्य दिंडींचा रंगीबेरंगी फुगे सोडून प्रारंभ केला.
यावेळी साहित्य कलाअकादमी पुरस्कार विजेते लेखक ल. म. कडू, राजीव तांबे, कवयत्री डॉ. संगीता बर्वे, शामची आई चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ, बालसाहित्यिक (लेखिका) आराध्या नंदकर, पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक ज्ञासाचे युवराज मलिक, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, ईस्कूलच्या मुख्याध्यापिका चैत्राली जैन संवाद पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर दिंडीच्या प्रस्थानाच्या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ल.म, कडू म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात स्थिर, शाश्वत जीवन जगता यावे यासाठी वाचन आवश्यक आहे. युवराज मलिक म्हणाले, पुस्तके समाजाला अन जीवनाला जोडतात. त्यामुळे पुस्तके वाचनाची गोडी मुलांना लावणे आवश्यक आहे. दिंडीतील सर्व सहभागी वारक-यांचा उल्लेख मलिक यांनी पुणे पुस्तक प्रदर्शनाचे ब्रँण्ड अम्बेसिडर असा केला. राजीव तांबे यांनी पुस्तक वाचणारा देव, चष्मा घातलेला देव अन व्हॉटसअप बघणारा देव आपण यापूर्वी कधीच बघितला नव्हता, पण या दिंडीच्या निमित्ताने तो मला बघायला मिळाला.
कवयत्री डॉ. संगीता बर्वे यांनी पुस्तक वाचनाचे महत्व आणि वाचन टाळण्यासाठीची आपली कारणं यावर एक कविता मुलांकडून म्हणून घेतली. “चला चला रे वाचू आपण पुस्तक …….”अशी कविता होती. पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून दिंडीला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक करताना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्यात वाचन संस्कृती रूजवण्यासाठी या दिंडीचे आयोजन संवाद पुणे संस्थेने केले आहे. दिंडी प्रस्थान कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली अत्रे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यानी केले.
या दिंडीमध्ये अग्रभागी भगवा ध्वज होता. ढोल – लेझीम पथक, पालखी, महाराष्ट्राची महान संत परंपरा, ऐतिहासिक व्यक्तीरेखांच्या वेषभूषेतील मुले, कॉमिक वल्र्ड, मोराल स्टोरीज, विविध राज्यातील पारंपारिक वेषभूषेतील बाल कलाकार, ऑटो बिओगर्गिस, नो आबाऊट पोएट, रामायणातील वेषभूषेतील कलाकार असे सुमारे 500 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी हातात केलेल्या वेषभूषेचे फलक घेतले होते. ही दिंडी बालभारतीपासून निघणार असून बीएमसीसी, रानडे इन्सिटट्यूट ते फर्ग्यसन महाविद्याल मैदनावर दिंडीचा समारोप झाला. हे पुणे पुस्तक प्रदर्शन फर्ग्यसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारपासून सुरू होणार आहे. आज प्रदर्शन स्थळी पोचलेल्या तीस दिंड्या मध्ये बाल साहित्यांची एकमेव दिंडी संवाद पुणेची होती.