पुणे-सलाम पुणे चे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध हास्यकलाकार , एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचे बुधवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे .सलाम पुणे च्या व्यासपीठावरून त्यांनी अनेकांना नृत्याची आणि आपली कला सादर करण्याची संधी दिली .चोरडिया यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून सातत्याने एड्स ग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केले. कलेला समाजसेवेची जोड देत त्यांची वाटचाल सुरू होती.नाट्य परिषद, साहित्य परिषद यावर ते कार्यरत होते .
रंगभूमी , दूरचित्रवाणी आणि चित्रपट अश्या तिनही माध्यमात ते गेली 38 वर्षे कार्यरत होते. झी टीव्ही वरील ‘हास्यसम्राट’ आणि सह्याद्री वाहिनीवरील ‘एम 2 जी 2’ या कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे ते घराघरात पोहोचले.. ‘दुसरी गोष्ट’ , ‘कँपँचिनो ‘, ‘ दगडाबाईची चाळ ‘ , ‘प्रेमा ‘, ‘सरगम’ अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘जीना इसी का नाम है’ आणि ‘फुल २ धमाल’ या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण त्यांच्या चौफेर कलावृतीची साक्ष देणारे होते.
भारतासह परदेशात त्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाचा झेंडा आपण रोवला. लंडन ,इस्राइल, ओमान येथील रसिकांना ‘हसवा हसवी’ या एकपात्री प्रयोगाने खळखळून हसविणारा विनोदवीर म्हणून ते सुपरिचीत होते.
त्यानी 15 हजारांहून अधिक वैविध्यपूर्ण रंगमंचीय कार्यक्रमांचा टप्पा ओलांडला होता. कला क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कलेच्या क्षेत्रात स्वतःची वैशिष्टयपूर्ण शैली निर्माण केली. कायमच केवळ आणि केवळ रसिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आपला ध्यास म्हणजे मनोरंजनाव्दारे समाजसेवा करण्याचा वसा त्यांनी घेतला होता. त्यामुळेच अनाथ, अपंग, दृष्टीहीन, वृध्द , मूकबधिर आणि कर्करोग ,एचआयव्ही अश्या विविध व्याधींनी ग्रस्त असलेले रूग्ण यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये विना मोबदला आपली हास्यसेवा रुजू केली. तसेच भारतीय सैनिक आणि पोलीसांच्या तणावपूर्ण जीवनात हलक्या फुलक्या क्षणांची बरसात केली. ‘सरहद ‘ यांच्या तर्फे थेट कारगिलला जाऊन सिमेवर तैनात भारतीय सैनिकांचेही आपण मनोरंजन केले. गेली 40 वर्षे ते थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधून रसिकांचे मनोरंजन करत होते. तसेच त्यांचे सामाजिक काम देखील मोठे होते.

