वाझेंच्या आरोपांवरून संजय राऊतांचा हल्ला–वाझेंना वॉशिंग मशीनमध्ये टाकतील
पुणे- तुरुंगातील आरोपींना भाजपकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जात आहे. पराभवाच्या भीतीने गुंडांचा वापर केला जात आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या खालच्या स्तरावरील राजकारणाचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांनी आज प्रसार माध्यमांशी भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले, ”वाझेंनी आज जयंत पाटलांचे नाव घेतले. उद्या बावनकुळे, अमित शहांचे नाव घेतील. अमित शहा तर तुरुंगातच जाऊन आलेले आहेत. काही दिवसांनी वाझेंना वॉशिंग मशीनमध्ये टाकतील. राज्याचे राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचले आहे. अशा प्रकारच्या राजकारणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याकडून उत्तर देण्यासाठी तुरुंगतील प्रवक्ते, गुंड यांची मदत घेतली जात आहे. भाजपवर संकट आले की हे आरोपी बाहेर येऊन बोलतात. त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे”, असा हल्ला राऊतांनी चढवला आहे.
पुढे राऊत म्हणाले, वाझे कोण आहेत? ते हत्येतील आरोपी आहेत. मात्र आता ते भाजपचे प्रवक्ते बनले आहेत. प्रसार माध्यमे त्यांना महत्त्व देत आहेत. देशातील जनता अशा प्रकारच्या राजकारणाचा तिरस्कार करते. भाजपकडून पराभवामुळे गुंडाची मदत घेतली जात आहे. गुंडांचा आश्रय घेत कधी जयंत पाटील, कधी संजय राऊत यांचे नाव घेतले जाते. मात्र तुरुंगातील आरोपीच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे?”, असे राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. आता विधासभेत देखील ते हरणार आहेत. त्यांच्याकडे दुसरे आहेच तरी काय? भाजपने वेब सिरीज बनवली आहे. त्यांना महाराष्ट्राचा मिर्झापूर करायचा आहे. स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही. पुरावे समोर आल्याने त्यांची फाटली आहे. म्हणून तुरुंगातील प्रवक्त्यांना बाहेर काढले जाईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ले केले जातील. त्यासाठी गुंडाना तुरुंगात फोन केले जातात”, असे गंभीर आरोप राऊतांनी केले.
दरम्यान, आज पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे. त्यावरून राऊतांना अमित शहा यांना उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार का असा सवाल करण्यात आला. यावरून त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, अमित शहा म्हणजे जय प्रकाश नारायण, सरदार पटेल नाहीत, ते कोण आहेत हे शरद पवारांनी सांगितले. बाहेरचे दोन लफंगे येऊन महाराष्ट्र बदनाम करत असतील तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे”, असे राऊत म्हणाले.

