पुणे-
भारताच्या महिला माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या १०६ व्या जयंती निमित्त आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आयर्न लेडी पंतप्रधान इंदिराजी गांधी या देशाच्या स्वाभिमान आहे. आज खास करून जयंती निमित्ताने काँग्रेस भवनचा परिसर अनेक महिलांच्या उपस्थितीने गौरवान्वित झाला आहे. इंदिरा गांधी यांची वीससूत्री प्रणाली आजही देशाला दिशादर्शक आहे. इंदिराजींनी त्यांच्या कालावधी मध्ये आणलेल्या विविध योजनांपैकी हरितक्रांती मुळे भारत देश सुजलाम सुफलाम झालेला आहे. त्यांनी जाहिर केलेल्या गरीबी हटाव नारा यामुळे पुढील ३० वर्षांमध्ये देशातील गरीबी ५०% ने कमी झाली.
विदेशी वस्तूंवर बहिष्कार करणाऱ्या आंदोलनाची पहिली समर्थक जीने आपले विदेशी कपडे व खेळणी यांची होळी केली ती लहानगी म्हणजे इंदिरा.
बालवयातच मायेचे छत्र हरपलेली, वडिलांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे स्वमदतीतून स्वत:ला सावरणारी निडर मुलगी म्हणजे इंदिरा.
‘मै नेहरू की बेटी हूँ कितना भी मारो मगर मै चिल्लाउंगी नही और तिरंगा झेंडा छोडुंगी नही’ असे इंग्रजांना ठणकाहून सांगणारी आंदोलक म्हणजे इंदिरा.
चूल आणि मूल यांच्या पलीकडे महिलांना काँग्रेस पक्षात पहिल्यांदाच महिलांसाठी एक स्वतंत्र्य फ्रंटल संघटक सुरू करून महिलांना जबाबदारी व अधिकारी देणारी पहिली महिला म्हणजे इंदिरा. प्रजासत्ताक राष्ट्राची साहसी, पोलादी महिला व आजवर झालेल्या पंतप्रधानांपैकी एकमेव महिला पंतप्रधान म्हणजे इंदिराजी गांधी.
तळागाळात कारखानदारी पोहचावी, सर्वांना रोजगार मिळावा अशी भूमिका इंदिरा गांधी यांची होती. स्थानिक नागरिक व नेतृत्वांची विचार सरणी बदलणार नाही तो पर्यंत राष्ट्र प्रगती करू शकणार नाही. त्यासाठी सर्वांची आर्थिक पत वाढली पाहिजे त्या अनुषंगाने बँकांचे राष्ट्रीयकरण करणारी व उद्योजकता वाढीस लावणारे धुरंधर नेतृत्व म्हणजे इंदिराजी गांधी होत. त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या ॲड. राजश्री अडसूळ, विठ्ठल गायकवाड, ॲड. अश्विनी गवारे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका लता राजगुरू, संगिता तिवारी, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, द. स. पोळेकर, सुरेश नांगरे, वाल्मिक जगताप, उषा राजगुरू, छाया जाधव, अनिता मखवाणी, ताई कसबे, मोतीबाई उडते, दिपक ओव्हाळ, आशुतोष जाधव, राज घलोत, फैयाज शेख, हरिदास अडसूळ, विठ्ठलराव हाडके आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांचे आभार प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी पाटील यांनी मानले. आभार व्यक्त ते म्हणाले की, ‘‘आधुनिक काळातील जीवनावश्यक तंत्रज्ञानाची पाया भरणी इंदिराजी गांधी यांनी केली. महिला आरक्षण मिळवून देणाऱ्या व महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या प्रणेत्या म्हणजे इंदिराजी गांधी होत. देशांतर्गत मैदान राजकारणाचे असो, आतंरराष्ट्रीय रणनीतीचे असो किंवा खेळाचे असो इंदिराजींनी कधीही जातीय भाषीय प्रांतीय भेदभावाला थारा दिला नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतात आशियाई खेळांचे भव्य दिव्य आयोजन केले होते. समता, समानता व बंधूभाव यांचे त्यांनी नेहमीच स्वागत केले.’’