जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिर्मठ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे प्रतिपादन : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन आणि आरती
पुणे : आज आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक यात्रा चालली आहे. ती व्यक्तिगत पातळीवरील यात्रा असेल किंवा समाज, देश पातळीवरील असेल त्या सगळ्यामध्ये काहीना काही बाधा आहेत. या बाधांना दूर करण्यासाठी गणेशाची आराधना करा. गणेशाच्या आराधनेमुळे पुणे शहर ही पुण्यभूमी झाली आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिर्मठ पिठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.
जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिर्मठ पिठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आरती करून उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले. फुलांच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अभय थोरात, विश्वास भोर, राजेश करळे, विकी खन्ना, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज म्हणाले, गणपती हा विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ता देखील आहे. जगद्गुरु शंकराचार्य यांनी जे अनुभव केले ते गणेश पंचरत्न स्तोत्रात सांगितले आहे. कलियुगात सगळे देवता आहेत परंतु चंडी विनायक प्रत्यक्ष आहेत, असेही त्यांनी सांगितले.