पुणे, दि. ०१ जुलै २०२४: जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातील वैष्णवांचे आकुर्डी, नाशिक फाटा, विश्रांतवाडी, नानापेठ, भवानी पेठ येथे महावितरणकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी वीजसुरक्षेसह विविध योजना व महावितरणच्या ग्राहकसेवेचा जागर करीत विविध उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
सोमवारी (दि. १ जुलै) दोन्ही पालखी सोहळा पुणे मुक्कामी असताना वारकऱ्यांचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले व श्री. सिंहाजीराव गायकवाड यांनी स्वागत केले. महावितरणकडून खास सुरु केलेल्या सेवा कक्षाद्वारे लाडूचे पाकिटे तसेच पावसापासून बचाव करणारे प्लॅस्टिकचे कापड वितरीत करण्यात आले.
याआधी रविवारी (दि. ३०) नाशिक फाटा येथे स्वागत कक्ष उभारून भाविकांना फराळ वाटप करण्यात आला. यावेळी महावितरणचे दिलिप गायकवाड यांनी भक्ती गिते सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले. तसेच आकुर्डी येथे पालखी सोहळा मुक्कामी असताना भाविकांची वैद्यकीय तपासणी करून फळ वाटप करण्यात आले. तसेच विश्रांतवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैष्णवांसाठी महावितरणकडून स्नेहभोजनाची सेवा देण्यात आली.
या पालखी सोहळ्यात विविध ठिकाणी वीजसुरक्षा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यासह महावितरणच्या विविध ग्राहकसेवांचे यामध्ये माहिती पत्रके, दृकश्राव्य माहितीपट, छोटेखानी प्रदर्शनी, संवाद, प्रात्यक्षिक आदींच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या सर्व उपक्रमांमध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, कार्यकारी अभियंता संजीव राठोड, अतुल देवकर, सोमनाथ मुंडे, विजय फुंदे, अशोक जाधव, चंद्रकांत दिघे, राजेंद्र येडके, रवींद्र आव्हाड, भाऊसाहेब सावंत, माणिक राठोड यांच्यासह विविध कार्यालयातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पुणे परिमंडल अंतर्गत पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे १७५ अभियंता व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासह वीज सुरक्षेसाठी उपाययोजना करीत दिडींतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपाहार आदींची महावितरणकडून सेवा देण्यात येत आहे.