मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेतील पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पंकजा मुंडे यांच्या देखील नावाच्या समावेश आहे. या मुळे पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन झाले असल्याची चर्चा होत आहे. पंकजा मुंडे यांच्या सोबतच योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे यांच्या नावाचा देखील यात समावेश आहे. योगेश टिळेकर यांना विधानपरिषद दिल्याने आता महायुतीत हडपसर विधानसभा मतदार संघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडणार कि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला सोडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विधानसभेच्या आधीच विधानपरिषदेच्या अनुषंगाने भाजपने आपली सोय मात्र लावून घेतली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.एकूण एकूण 11 जागांसाठी होणाऱ्या या विधान परिषदेत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वाटेला पाच जागांचा येणार आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. या आधी देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेवर करण्यात आली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना संधी डावलण्यात आली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे उमेदवारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतल्यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे यांच्या या निवडीमुळे आता परळी विधानसभा मतदार संघातून धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
या आधी विधान परिषदेवर असलेले महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्या जागी सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून सदाभाऊ खोत यांच्याकडे पाहिले जाते. या माध्यमातून शेतकऱ्यांना साधण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.