पुणे-अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढा, अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता पण नको, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले आहे, असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्यासमोरच मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे पुण्यासह बारामतीतील महायुतीत काही आलबेलं नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासंदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी ही नाराजी उघडपणे मांडली. शिरूर लोकसभा आढावा बैठक पुण्यात सुरू होती. त्यावेळी त्यांनी थेट अजित पवारांवर आरोप करत त्यांना महायुतीतून काढा, अशी मागणी केली.
बैठकीत बोलताना भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी म्हणाले की, अजित पवारांना या महायुतीतून बाहेर काढा, असे प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे. याला तुम्ही सल्ला समजलात तरी चालेल. अजित पवारांनी सुभाष बापू, राहुल दादांवर, योगेश अण्णांवर अन्याय केला आहे. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादांकडे आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे निधी मागायला गेले तर अजितदादा म्हणाले तुमचा काय संबंध आम्ही 10 टक्केच निधी देणार, अरे नको आम्हाला असली सत्ता, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.सुदर्शन चौधरी म्हणाले की, अजित पवारांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची अशीच परिस्थिती आहे. सोलापूरला कायम बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळाला आहे. स्वाभिमानी नेतृत्त्व पुणे जिल्ह्याला मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहे.
अहो आम्ही ज्या राष्ट्रवादीचा गेली 10 वर्षे आम्ही विरोध करतोय तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी आणून ठेवली आहे. अक्षरश: कार्यकर्ते भीतीच्या वातावरणात आहे. अजित पवारांना कशासाठी सत्तेत घेतले आहे? असा सवाल भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्षांनी बैठकीत उपस्थित करत उघडपणे नाराजी व्यक्त केली.
भाजपच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून ते तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीमध्ये अजित पवार आणि विधानसभेला सत्ता येत असेल तर ती सत्ता नको आहे, अशी भावना आहे. काय करायचे अशा सत्तेचे! अजित पवारांनी पालकमंत्री व्हायचे, तिथे त्यांनी बॉस व्हायचे आणि आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचे काम करायचे, नको आम्हाला असली सत्ता, अशी भावना भाजप उपाध्यक्षांनी मांडली.