अरविंद केजरीवाल प्रकरणात सरकारने दबाव तंत्राचा वापर करुन जामीन रद्द करुन घेतला’
मुंबई-आता मोदींना राहुल गांधींना रामराम करावा लागणार आहे. त्यांना सभागृहातून पळ काढता येणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का? असे म्हणत त्यांनी AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पाठराखण देखील केली आहे. ओवैसी यांनी लोकसभेत शपथ घेताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र संजय राऊत यांनी ओवैसी यांची पाठराखण केली. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चालली. मात्र आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही. तसेच अरविंद केजरीवाल प्रकरणात सरकारने दबाव तंत्राचा वापर करुन जामीन रद्द करुन घेतला”, असा आरोप राऊतांनी केला आहे.असदुद्दीन ओवैसी यांच्याबाबत बोलतांना राऊतांनी म्हंटले आहे की, ”पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का?”, असे संजय राऊत म्हणाले.यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लादली आहे असा आरोप केला. ते म्हणाले, ”लोकसभेत अध्यक्षपद सत्ताधारी तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाते. सदनात ही परंपरा राहिली आहे. आता तर विरोधी पक्ष मजबूत आहे. 240 पेक्षा जास्त खासदार विरोधी पक्षाकडे आहे. परंतु त्यानंतरही लोकसभेतील परंपरा सत्ताधारी पक्षाने मोडली आहे. त्यामुळे आता विरोधकांना एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाने लोकसभा अध्यक्षाची निवडणूक लादली आहे”, असे राऊत म्हणाले.
तसेच गेल्या दहा वर्षांपासून परंपरा आहे की, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. लोकसभा अध्यक्षपदावर बसल्यावर ते कोणत्याही पक्षाच राहत नाही. पण गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे हुकूम मानणारे लोकं त्याठिकाणी बसतात. फार मोठी परंपरा त्या पदाला असली तरी ती भारतीय जनता पक्षाने मोडून काढली आहे.आधीच्या लोकसभेत एकाच वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्ला यांना जाणीवपूर्वक लोकअध्यक्षपदावर पुन्हा आणण्याचा प्रयत्न झाला, असा हल्लाही राऊतांनी चढवला आहे.