बारामती-केंद्र व राज्यातील सरकार आज आमच्या हातात नाही. पण तुम्ही लोकसभा निवडणुकीला काम केले तसे विधानसभेच्या निवडणुकीला केले तर राज्य सरकार हातात कसे येत नाही हे मी पाहतोच, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राज्य सरकार हातात आले तर जनतेची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही, असे ते म्हणालेत.
शरद पवार सध्या बारामतीच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ग्रामीण भागात जाऊन दुष्काळग्रस्त जनतेच्या व्यथा समजून घेत आहेत. बारामतीच्या नीरावागज येथील एका सभेत तेथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त विधान केले. तसेच जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी नागिरकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे.
शरद पवार म्हणाले की, आज केंद्र व राज्य सरकार आमच्या हातात नाही. पण लोकसभा निवडणुकीत जसे आपण केले, तसेच काम उद्याच्या विधानसभा निवडणुकीत केले, तर राज्य सरकार कसे हातात येत नाही ते मी पाहतोच. एकदा का राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला मला वेळ लागणार नाही. नेत्यांनी काही केले नाही. पण मी तुमच्या पाठिशी उभा राहणार आहे. आपण एका विचाराने राहून हे दुरुस्त करू, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कानावरही मी हे प्रश्न घातलेत. त्यांनी निर्णय घेतला तर आनंदच, पण नाही घेतला, तर लोकशाहीमध्ये जनतेच्या जोरावर योग्य पद्धतीने काय सांगायचे ते मला माहिती आहे, असा इशाराही शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.