मुंबई -वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने सोमवारी पुन्हा एकदा केला. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद आहे. या प्रकरणी 19 व्या फेरीपर्यंत सर्वकाही सुरुळीत सुरू होते. पण त्यानंतर खरी गडबड सुरू झाली. यासंबंधी निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आहे. त्यांनी आम्हाला मतमोजणीचे आकडेही नाकारले, असे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. या दोघांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा दिला आहे.
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर व शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. त्यात प्रथम कीर्तिकर यांना अवघ्या 1 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. पण त्यानंतर झालेल्या फेरमतमोजणीनंतर वायकर यांचा 48 मतांनी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले. मतमोजणीचा हा गोंधळ संशयास्पद असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व आमदार अनिल परब यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेद्वारे आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. वायव्य मुंबईची जागा आम्ही जिंकली आहे. मुंबईकरांनी हुकूमशाहीविरोधात दिलेला निर्णय जगजाहीर आहे. वायव्य मुंबईत निकाल हेतुपुरस्सर बदलण्यात आला, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.या प्रकरणी आजपासून लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या हातात यंत्रणा नसती आणि निवडणूक पारदर्शक व मोकळ्या वातावरणात झाली असती तर भाजपला 240 सोडा साध्या 40 जागाही मिळाल्या नसत्या. आज जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. भाजपला ज्या काही जागा मिळाल्या आहेत, त्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही या प्रकरणी कोर्टात पाठपुरावा करून ही जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
अनिल परब यांनी यावेळी मतमोजणी केंद्रातील संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. हा पराभव अत्यंत संशयास्पद आहे. आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहोत. निवडणुकीची एक प्रक्रिया असते. पण याठिकाणी या प्रक्रियेला पूर्णतः हरताळ फासण्यात आला. हे सर्वकाही 19 व्या फेरीनंतर घडले.19 व्या फेरीनंतर निवडणुकीच्या निकालामधील पारदर्शकता बंद झाली. सर्वसाधारणतः कोणत्याही मतमोजणीची एक फेरी झाल्यानंतर निवडणूक अधिकारी फेरीनिहाय उमेदवारांना पडलेली मते सांगत असतात. 19 व्या फेरीनंतर सर्वकाही बरोबर होते. पण त्यानंतर आम्हाला कोणतीही मते सांगण्यात आली नाही. 22 व्या फेरीनंतर अचानक निकाल जाहीर करण्यात आला, असा आरोप अनिल परब यांनी केला.एआरओ व आमच्या टेबलमध्ये फार अंतर ठेवण्यात आले. यामुळे आम्हाला त्यांचा मतांचा हिशेब कळत नव्हता. अनेक मतदान केंद्रांवर आम्हाला 17 सीचा फॉर्म आम्हाला देण्यात आला नाही. आता आमच्या व निवडणूक आयोगाच्या मतांमध्ये जवळपास 650 हून अधिक मतांचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे हा संपूर्ण निकाल संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.निकालात गडबड वाटल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. त्यावर आम्हाला 2 दिवसांनी देण्याची ग्वाही देण्यात आली. पण आता ते कोर्टाचा दाखला देत हे फुटेज देण्यास नकार देत आहेत. मतमोजणीवेळी वापरण्यात आलेल्या मोबाइलवर कुणाचे फोन आले, त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. या मतमोजणीनंतर 10 दिवसांनी गुन्हा दाखल झाला. या मधल्या काळात मोबाइल बदलण्यात आल्याचा आमचा आरोप आहे. या प्रकरणी गुरव नामक व्यक्ती कोण आहे? अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाइल का वापरला? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळाली पाहिजेत, अशी मागणीही अनिल परब यांनी यावेळी केली.