पुणे- जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रार देण्याची धमकी देऊन कात्रज परिसरातील हाॅटेलचालकांकडून पाच लाखांची खंडणी घेणाऱ्या दोन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.निखिल सुनील शिंदे (वय 30), सिद्धार्थ राहुल रणपिसे (वय 28, दोघे रा. समता सोसायटी, सहकारनगर,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत विश्वनाथ पद्मनाभ पुजारी (वय 57, रा. अमित ॲस्टोनिया, आंबेगाव-नऱ्हे रस्ता, कात्रज,पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.
पुजारी यांचे कात्रज परिसरात जंक्शन बार आहे. आरोपी शिंदे, रणपिसे कात्रज चौक परिसरातील रेस्टोरंट आणि बारचालकांना काही दिवसांपूर्वी जाऊन भेटले. तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहेत.हॉटेलला पार्किंग व्यवस्था नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार देण्यात येणार आहे, अशी धमकी देखील आरोपींनी दिली.अशाच प्रकारे पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हाॅटेल, बारचालकांना धमकावून त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली. त्यानंतर पुजारी यांच्यासह अन्य हाॅटेलचालकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. पुजारी यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या शिंदे आणि रणपिसे यांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पुढील तपास करत आहेत.