- आरपीआयच्या शिष्टमंडळाच्या निवेदनानंतर जिल्ह्याधिकारी, महापालिकेची कार्यवाही
- प्राथमिक टप्यात तात्काळ अडीच हजार रुपयांची मदत मिळणार
पुणे –
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाळ्यात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. सुरुवातीच्या टप्यात तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे. त्यानंतर आणखीन मदतीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जाणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. या वेळी प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक पाऊले उचलत ही घोषणा केली.
या वेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, वसंत बनसोडे, शाम सदाफुले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआयच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देशासह राज्यात मान्सून दाखल झाला आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना त्यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. बळीराजा देखील सुखावला आहे. ही एक बाजू असताना दुसऱ्या बाजूला गेली दोन आठवडे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम राहत असल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचण्याच्या मोठ्या घटना घडल्या. नागरीवस्तीत पाण्याचा शिरकाव झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या घरांची दुरवस्था झाली. यासह वाहनधारकांचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांची वाहने वाहून गेली तर काहींची वाहने बंद पडली.
वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडली. अनेकांच्या वाहनांवर देखील झाडे पडण्याच्या घटना घडल्या. या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखीन खर्चाचा बुर्दंड बसला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत मिळावी. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. याबाबत त्वरित शासकीय पातळीवर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली.
यावर दोन्ही प्रशासनाने सुरुवातीच्या टप्यात तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचे जाहीर केले. त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा करून आणखीन मदतीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ओढ्यावरील अतिक्रमण हटवा –
तसेच शहरातील ओढ्यांच्या बाजूला केंद्रीय संरक्षण विभागाने सीमा भिंती घातलेल्या आहेत. वडगाव शेरी सह पुण्यातील विविध परिसरात ही परिस्थिती आहे. त्यामुळे या सीमाभिंती काढून ओढ्यांचे पात्र मोठे करण्याबाबत कार्यवाही करावी. पावसामध्ये जीवितहानीची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफचे पथक पुण्यात कायमस्वरूपी तैनात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी होणाऱ्या धावपळीपासून मुक्तता होईल. याबरोबरच शहरातील नाल्यांवर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढून विकसित आराखड्याप्रमाणे नाल्यांचे रुंदीकरण करावे. तसे आदेश पुणे महापालिकेला द्यावे. विशेषता धानोरी रस्ता ते साठे बिस्कीटकडे जाणारा तसेच धानोरी ते नगररोड मार्गे नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण झाले असून त्याच्या रुंदीकरणाची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली.
पुणेकरांसाठी आरपीआयची धाव –
यंदाच्या वर्षी झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. साचलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. नुकसानीला सामोरे जाताना नागरिकांच्या नाकी नऊ येत आहे. या दरम्यान शासनाकडे मदतीसाठी कोणी पाठपुरावा करत नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आरपीआयचे शिष्टमंडळ धावून आले. नागरिकांना मदत मिळावी म्हणून मागणी केली. त्या मागणीला यश आले आहे.