अमरेंद्र भास्कर बालकुमार संस्थेचा बालवाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पुणे ः आता मराठी साहित्य आणि त्या विषयक उपक्रमांचा प्रदेश विस्तार होत असून केवळ शहरापुरते मर्यादित न राहता खेडोपाड्यात आदिवासी भागात देखील बालसाहित्याचा विस्तार होताना दिसत आहे. त्यामुळे मराठी मध्ये विपुल आणि विविधतापूर्ण असे बाल वाङ्मय लिहिले जात आहे, ही समाधानाची बाब आहे. आजच्या काळात बाल साहित्याची खूप गरज आहे. त्यामुळे शालेय पुस्तकांच्या व्यतिरिक्त ज्ञाऩात्मक, अभ्यासात्मक आणि आजच्या काळातील मुलांना समोर ठेवून मराठी बाल साहित्याचे विश्व अधिक समृध्द केले पाहिजे, असे मत असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती पुणे येथील सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डॉ. न. म. जोशी, बालभारती किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे, पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, बालकुमार संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, राष्ट्रभाषा सभेेचे संचालक ज.गं.फगरे, निवृत्त शिक्षक एम.के.गोंधळी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
बालकथा विभाग पुरस्कार रेखा बैजल जालना( तुमचा आमचा संजू), रश्मी गुजराथी पुणे (आभाळातील जहाज), नागेश शेवाळकर पुणे (मोबाईल माझा गुरू), बालकाव्य विभाग – मीनाक्षी आचमे नांदेड ( इटूकली पिटूकली) जयश्री पाटील सांगली (बालजगत), ललिता सबनीस पुणे( लहानपण देगा देवा ), बालकादंबरी विभाग – बबन शिंदे हिंगोली ( वंचितांचे राजे छ. शाहू महाराज), बालनाटिका विभाग – शुभदा सुरंगे पुणे ( घर पळून गेलं ), नाट्यछटा विभाग – डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर ( बहुढंगी बहुरंगी ), मुलांचा काव्यसंग्रह विभाग – मसाप मावळ शाखा (परीघ) यांना प्रदान करण्यात आला.
डाॅ. न. म. जोशी म्हणाले, बालसाहित्यिकांनी विविध प्रयोग केले पाहिजेत. नविन आणि वेगवेगळे साहित्य लिहिले पाहिजे. त्याचबरोबर साहित्य संस्थानी, साहित्य महामंडळाने ही बालसाहित्याची स्वतंत्र दखल घेणे आवश्यक आहे. बालसाहित्य प्रकाशनाला विशेष अनुदान देखील दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
किरण केंद्रे म्हणाले, मराठी साहित्यक्षेत्रात सर्वात जास्त काम हे बालसाहित्यात झाले पाहिजे. मुलांसाठी लिहिणे अत्यंत महत्वाचे असून त्यातून एक पिढी घडवण्याचे काम केले जाते. दुर्दैवाने बालसाहित्यिक असा शिक्का आपल्यावर लागेल म्हणून अनेक मोठे साहित्यिक त्यापासून दूर झाले आहेत. परंतु त्याचे नुकसान मराठी साहित्यावरच होत आहे हा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. आज मुले वाचत नाही असे आपण म्हणतो आणि माध्यमांना दोष देतो. परंतु आपण मुलांना वाचण्यासाठी चांगले साहित्य देतो का याचा देखील विचार केला पाहिजे. माध्यमांचा वापर वाचन संस्कृती वाढण्यासाठी कसा होईल याचा विचार करून त्यासाठी नविन व दर्जेदार लेखन करावे, असेही त्यांनी सांगितले.
राजन लाखे म्हणाले, बालसाहित्य कसे असावे, ते कसे वाढेल तसेच बालसाहित्याचे भावविश्व फुलविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. बालसाहित्य पुरस्कार, बालकुमार साहित्य संमेलन, कथाकथन, लेखक आपल्या भेटीला, असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबविले जातात. बालसाहित्याकांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने राज्यभरातील साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो. विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.